07 December 2021
इगो इज द् एनिमी
06 December 2021
अन्न
शरद ऋतूतील एक उज्ज्वल
दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात
व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक
उपाशी टोळ आले.
हात मध्ये सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच
" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ? उन्हाळ्यात तू झोपला होतस कि काय ?”
टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता," "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."
मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...
https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391
05 December 2021
गुलाब
त्या झाडाची एकच तक्रार होती त्याच्या समोरच एक कुरुप निवडुंगाचे झाड वाढत होते. गुलाबाचे झाड रोज निवडुंगाचा अपमान करायचे आणि त्याच्या दिसण्यावरून त्याची थट्टा करायचा, तर निवडुंग शांत बसून असल्याचं तो गुलाबाच्या झाडाला प्रतिउत्तर देत नसे . आजूबाजूच्या इतर सर्व वनस्पतींनी गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न केला . परंतु ते झाड व त्याची फुले स्वत: च्या दिसण्याने खूप गर्विष्ठ झाली होती .
एक काय झाले वाळवंटात कडक उन्हाळा पडला , वाळवंट कोरडे झाले आणि झाडांना पाणी उरले नाही. गुलाब पटकन कोमेजायला लागला. तिच्या सुंदर पाकळ्या सुकल्या, त्यांचा हिरवा रंग निस्तेज झाला
त्यावेळी त्याची नजर निवडुंगाकडे गेले निवडुंगाकडे पाहत असताना गुलाबाच्या लक्षात आले एक चिमणी पाणी पिण्यासाठी आपली चोच निवडुंगाच्या पानात बुडवताना दिसली.
शरमेने चूर झालेल्या गुलाबाने निवडुंगाला विचारले की तिला थोडे पाणी मिळेल का ? दयाळू निवडुंगाने सहज सहमती दर्शवली आणि कठीण उन्हाळ्यात त्यांना मित्र म्हणून मदत केली.
इगो इज द् एनिमी
02 December 2021
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर
कोना कोणाला शाळेत हि कविता शिकवत असताना झालेल्या गमती आटवतात
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
कवयित्री – बहिणाबाई चौधरी
मेरा बाबा देशचालता ....
मेरा बाबा देशचालता ....
आठवणींचे झरे वाहू लागले आणि काही वर्ष पूर्वीचा एक क्षण
आठवला माझा सिनेमा पाहणे एक छंदच आहे आणि कोणासोबत बघायचा हा एक महत्वाचा भाग हे माझं वैयक्तिक मत आहे. मी
सिनेमा माझ्या दोन मित्रांसोबत पहातो गणेश शेटे आणि श्रीकांत चावडीमनी नेहमी आम्ही सिनेमे एकत्रच पाहतो पण कुण्या
एकट्याने पाहिलेला सिनेमा जर आवडला तर परत सर्वांनी एकत्र मिळून पहाणे हा नियम ठरलेला. https://youtu.be/pcNHMopzZas
काही वर्षां पूर्वी कोर्ट हा सिनेमा पाहून झाल्यानंतर आम्ही तिघांनी एकत्र फारशी काही चर्चा केली नाही.
चर्चा केली नाही म्हणजे फक्त आम्ही एकामेकांकडे पाहत होतो कदाचित याच्या विषयी काय बोलावं ते सुचत नव्हतं किंबहुना याविषयी खूप काहीतरी बोलले गेले पाहिजे असं वाटत असलं तरी आम्ही एकमेकांना फक्त पाहतच राहिलो होतो विषय तसा गंभीर होता . खरं बघायला गेलं तर त्या सिनेमाने डोळ्यासमोर समाजा मधला एक दुर्लक्षिलेला असा वर्ग आणला होता की जो समाजासाठी एका युद्धाचे काम करीत आला आहे आणि करतो आहे.
तर मित्रानो रतन
टाटा यांनी शेयर केलेले हो विडिओ
पाहिल्यानंतर कोर्ट सिनेमा नक्की पहा….
कोर्ट हा २०१४ चा भारतीय बहुभाषिक कायदेशीर नाटक चित्रपट आहे,
जो चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा
चित्रपट नारायण कांबळे ( विरा साथिदार ) या वृद्ध विरोधक गायकाच्या मुंबई सत्र
न्यायालयात खटल्याद्वारे भारतीय कायदेशीर व्यवस्थेचे परीक्षण करतो,
ज्यावर त्याच्या एका लोकगीताद्वारे गटार सफाई कर्मचाऱ्याला
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
चित्रपटाचे संगीत संभाजी भगत यांनी दिले होते तर मृणाल देसाई आणि रिखव देसाई
यांनी अनुक्रमे छायालेखक आणि संपादक म्हणून काम केले होते. वास्तविक कोर्टरूम आणि
चित्रपटांमध्ये त्यांचे चित्रण कसे केले जाते यातील फरक पाहण्यासाठी ताम्हाणे
उत्सुक होते. चित्रपटात मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषा बोलल्या जातात. बहुतेक
संवाद मराठीत आहेत कारण ते महाराष्ट्रात सेट आहे. कायदे इंग्रजीत वाचले जातात.
बचाव पक्षाचे वकील हे गुजराती असून ते गुजराती भाषा बोलतात.
२०१४ मध्ये ७१ व्या
व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोर्टचा प्रीमियर झाला,
जिथे त्याने होरायझन्स श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि
ताम्हाणेसाठी लुइगी डी लॉरेंटिस पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने अनेक चित्रपट
महोत्सवांमध्ये १८ इतर पुरस्कार जिंकले. २०१४ च्या मुंबई चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
विभागात त्याचा प्रीमियर भारतात झाला आणि १७ एप्रिल २०१५
रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यावर,
चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि ६२ व्या
राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कार जिंकला. पुरस्कार.
ययाती
ययाती
महाराष्ट्र
साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात ययातीचे नाव
अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.
ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट
रचना. वाचून झालं की हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या
आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी,
शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो
गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात
गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय त्यांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना
एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि
अपुरे राहते.
कामवासना हा या
कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो ,
त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात
अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी
पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी
शेवटपर्यंत राहतात.
यातला कच हा आधुनिक काळातल्या
आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला
खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे.
आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष
प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले
असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली
प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत
संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे.
देवयानी या पात्राचे
तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक
आहे बघा ! आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश
मुले ध्येयहिनच असतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच
होतं. कुठलाही योग्य निर्णय न घेता , पुरेसा
विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी
देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक
- मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी
आणि अविचारी लहान पोर दिसून येते.
आणि कदाचित याच कारणामुळे ययाति
शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व
शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतःच्या एका चुकीमुळे
ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग
करते , हे धाडसच !
कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत
स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची
कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत
वाक्ये.. खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे.
कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती
भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा
मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात.
कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होतं !
वाचताना आपण प्रत्येक पात्राशी
समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं आपल्या अंतर्मनात राग ,
द्वेष , मत्सर , अश्रू ,
दया , कणव , करुणा ,
आसुया या भावना युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं
अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा
प्रयत्न करतं.
काही कादंबऱ्या मादक असतात. त्या
भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच
पट्टीतल्या.
ययाती समजून घ्यावी लागते !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही
कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी.
यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत.
कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक
गोष्टी कळतील , समजतील , नव्याने
उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी !
01 December 2021
पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता
पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता
आठवले साहेबांचा काम करायच्या हेतूने
शाखा अध्यक्ष झालेला नवीन पोरगा ज्याचं टमटम
फायन्सन हप्त्यांने घेतलेले होते..
पुढे तो...पद मिळतेय म्हणून
निकाळजे गटात जातो...
त्यातही कोणी विचारत नाही.…
जो तो आपली पोळी भाजायला बसलेला आहे असं वाटतंय म्हणून
बाबासाहेबांच्या जवळची चळवळ आणि
त्यांच्या विचारांची हाक म्हणून बाळासाहेबाच्या पक्षात पद घेऊन कामाला लागला....
त्याला तिथंही विचारेनात म्हणून...
तो आता पुन्हा आठवले साहेबांच्या पक्षात येतोय....
पक्ष कार्यकर्ता म्हणून...
या सगळ्या प्रवासात...
4 ते 5 वर्षाच्या कालखंडात....
हप्त्यांने घेतलेले टमटम जून झालं आहे..
दरवाजा ला सड लागली आहे
इंजिन धुकधुक करत धूर मारायला लागला आहे
खडाखड आवाज येत आहे....
त्याला धक्का मारून चालू करावं लागत आहे
मुलगा टमटमचा मालक आहे
कर्तृत्ववान आहे म्हणून...
त्याचे लग्न झालेले
त्याला एक मुलगी.... एक मुलगा अशी...लहान मुलं आहेत...
पक्ष बदलले पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही
बदलली उलट अजून वाईट झालीय....
या 5 वर्षाच्या काळात फक्त कार्यकर्ता म्हणूनच त्याचा वापर झालाय हे त्याला समजले नाहीय...
उलट तो म्हणतोय ...
बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून
समाजात काहीतरी काम करायची संधी मिळाली तर
माझ्यासाठी मी भाग्य समजतो..
आता याला कुणी सांगायचं ...
तू कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी वापर करून घेत फक्त तुझी मारली आहे...
राजकारण
पक्ष अध्यक्ष
पक्षाचा सदस्य
कार्यकर्ता
कार्यक्रमातला फेटा
एखादा स्टेजवरचा सत्कार
वाढदिवसाचा केक म्हणजे चळवळ नाही....
स्वता भिकारी होणे म्हणजे चळवळ नाही....
हे त्याला..आता... कसं समजावू...
आंबेडकरी चळवळ भिकेला लागायला हे गट तट आणि त्यांच्यातला स्वार्थ तर कारणीभूत आहेच पण अगदी बुद्धी घाण ठेवून भावनिक असलेला प्रत्येकजण आहे जो स्वताला बाबासाहेबांचा अनुयायी समजतो...
नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य
भारताचे
सर्वात मोठे रहस्य
मृत्यू अटळ ! पण तो जर गूढ असेल तर..... आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांची असेल तर , त्यावर तर चर्चा होईलच ना !
आपल्या
देशातील दोन महापुरुष , ज्यांचे महान नेतृत्व , अफाट कर्तुत्व होते पण त्यांचा अंत मात्र देशासाठी अतिशय क्लेशदायक ठरला. कारण
ते मृत्यू गूढ होते....
ते
म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री!
अनुज
धर हे एक शोध पत्रकार! त्यांनी या संदर्भात अतिशय खोलात जाऊन, देशविदेशातील लोकांना भेटून, उपलब्ध कागद पत्रांचा
पुरावा म्हणून वापर करून,व्यवस्थेच्या ,सरकारच्या विरोधात जाऊन लिखाण
केलं....त्यांची ही दोन पुस्तकं !
v नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य
अनुज
धर यांनी लिहिलेले पुस्तकं विशेष सवलतीच्या दराने उपलब्ध !
पुस्तक
उघडताच वाचकाला पहिला धक्का बसतो.अजून पुस्तकाची सुरुवात ही झालेली नसते !
त्याआधीच लेखक स्पष्टपणे लिहितो,नेताजींच्या मृत्युचा शोध
घेण्यात सरकारने मुद्दामहून अडथळे आणले.ज्यांच्या आधारे लेखक लिहितो त्या गोपनीय
कागदपत्रांचे उतारे आणि फोटो पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतात हे त्यापेक्षा ही
मोठे आश्चर्य आहे... कारण यातील बरीच कागदपत्र अजूनही गोपनीय आहेत !
महानायक
नेताजी! भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राण ओतला.निस्तेज झालेला
स्वातंत्र्यलढा ज्यांनी ढण ढना पेटवला!
तरुणांचे
ताईत ! उभ्या भारताचे लाडके नेते!गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला हरवून जे
काँग्रेस चे अध्यक्ष झाले होते ! काँग्रेस मधील गांधी गटाने त्यांचे नेतृत्व
अकार्यक्षम व्हावे यासाठी लागतील ते प्रयत्न केले.शेवटी तर त्यांना काँग्रेस मधून
बहिस्कृत करून माफी मागण्यास सांगितले.
ब्रिटिश सरकारच्या नजरेत धूळ फेकून वेषांतर करून काबूल- मास्को मार्गे बर्लिन
ला जाऊन भारतासाठी प्रयत्न केले.जर्मनीत हिटलर शी बोलले. तेथून पाणबुडी ने
पाण्याखालून प्रवास करून जपान ला पोहचले.
आझाद हिंद सेनेची आणि आझाद हिंद सरकारची कमान सांभाळली! चलो दिल्ली म्हणून
भारतच्या स्वातंत्र्यासाठी थेट युद्धाला सुरुवात केली! अशा या लोकप्रिय नेत्याचा
दुर्दैवी अंत कसा झाला हेच भारतीय जनतेला अजून माहीत नाही !
हे पुस्तक लिहिणे ही एक मोठा पराक्रम आहे.कारण यातील अनेक कागदपत्र आणि नावे
खूप मोठ्या व्यक्तींकडे निर्देश करतात.दहा वर्षे अभ्यास करून लिहायला सुरू केलेला
हा शोध ग्रंथ इंग्रजी भाषेत तुफान लोकप्रिय ठरला.विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले.असा
हा ग्रंथ आपल्यासाठी मराठी भाषेत!
या पुस्तकातील एकेक उतारा आणि एकेक वाक्य भयंकर वास्तवाला समोर आणणारे
आहे.आपले अनेक समज हे गैरसमज आहेत हे वाचकाला पुस्तक वाचताना समजायला
लागते.पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात माहितीच्या अधिकारात लेखकाने मागितलेल्या
कागदपत्रांचा तपशील त्यांना मिळणार नाही याची पूर्ण काळजी सरकारी अधिकाऱ्यांकडून
घेतली जात होती.कमी महत्वाचे आणि बिन महत्वाची कागपत्रे उपलब्ध करून दिली जात
होती.आम्ही म्हणू ती पूर्व असा स्वभाव झालेल्या बाबू लोकांना माहितीच्या अधिकाराचा
त्रास होऊ लागला...सरकारला नेताजींच्या मृत्युचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करू द्यायचा नव्हता असे स्पष्ट दिसून येते.
नेताजींच्या मृत्यू सारखेच अजून एक गूढ होते आझाद हिंद सरकारच्या प्रचंड
खजिन्याचे!रोख रक्कम जी जपानी येन मध्ये होती.पण त्या पेक्षा कितीतरी अधिक खजिना
हा सोन्याच्या स्वरूपात होता.या खजिन्याचे पुढे काय झाले? नेताजींचे सहकारी यात सामील झाले का? जे
पुढे सरकारचे ही काम करू लागले.अय्यर त्या पैकी एक! ज्यांना या खजिन्याची पूर्ण
माहिती होती.त्यांनीच त्याची योजना केली होती.भारत सरकारला हवा असलेला
"अर्थपूर्ण " व्यवहार करून भारत
सरकारला त्यांनी सहाय्य केलं होते.स्वाभाविक त्यांच्यावर अनेक इतर सहकाऱ्यांचा रोष
होता...संशयाची सुई त्यांच्याकडे थेट येऊन थांबत होती.
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नेताजींच्या मृत्युचा शोध घ्यायला
फारसे उत्सुक नव्हते, हे त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या वेळी
उत्तरातून दिसून येते.सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल सरकार अजून कोणत्याही
उत्तरासाठी असमर्थ आहेत असे सांगत.पण त्याच काळात नेहरू मात्र ,'मला यात कोणताही संशय नाही.'अशी ठाम भूमिका घेत!
पंतप्रधानच स्वतः परराष्ट्रमंत्री असल्याने ही अनेक गोष्टींना न्याय मिळत नव्हता
हे या पुस्तकातून कळते.१९५२ ला संसदेत नेताजींच्या मृत्यू संदर्भात प्रश्न विचारू
दिलेला नव्हता!
जपान सरकारने हा विषय अत्यंत विचित्र हाताळला आहे असेही लक्ष्यात येते.प्रचंड
असलेल्या संपत्तीसाठी तर जखमी नेताजींचा अंत केला गेला नाही ना? असाही प्रश्न वाचकांच्या मनात उठतो.त्याचा तपशील या पुस्तकात विविध पातळीवर
आणि कागद पत्रांचा पुरावा मिळत जाताना दिसतो.
हे पुस्तक वाचून वाचकाने आपले मत बनवले पाहिजे असे वाटते.त्यामुळे यात
असलेल्या अनेक गोष्टी पुस्तकाच्या परिचयात देण्याचे मी टाळत आहे.त्या पैकी एक
म्हणजे " साधू भगवान जी!" जे कायम एकांतात असायचे.कोणाला भेटायचे
नाही.बोलायचे नाही.आपले दर्शन द्यायचे नाही.पण जगाला मात्र ते नेताजी वाटू
लागले.मग असे अनेक साधू वाटायला लागले.....हा प्रकार काय आहे?
जपान मधील रेंकोजी बुद्ध मंदिरात असलेली रक्षा भारतात अनेकवेळा पाठवण्याचा
प्रयत्न केला आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही रक्षा नेताजींची नाही....पण या
संदर्भातील मत मतांतर आणि सरकारी काम याविषयी एक प्रकरण आहे.सुन्न करणारी यातील
माहिती आहे.
एकूणच हे पुस्तक फारच विस्फोटक आहे.नेताजी जर जिवंतपणी भारतात परतले असते तर ? काय झाले असते ? म्हणून ते जिवंतपणे भारतात परतणार
नाहीत याची काळजी घेतली गेली असेल का?विमान अपघात ही
निव्वळ बनवलेली कथा ! नेताजी रशियात गेले! तिथेच तुरुंगात त्यांना राहावे
लागले....भारतात परतले तरीही ते इंग्रजांच्या ताब्यात दिले जाणार होते....यात
गांधीजी ही सहभागी होते...असेही एक प्रकरणं यात आहे.
लेखक
: अनुज धर
मराठी
अनुवाद : डॉ मीना शेटे संभू
प्रकाशन
: विश्वकर्मा पब्लिकेशन्स
आकार
:डबल क्रॉउन मोठा आकार
पाने
:४९५
किंमत
:६५०/-
सवलत
मूल्य:६००/ होम डिलिव्हरी!
9421605019
30 November 2021
माझ्या आयुष्यात असं का घडतं ?
माझ्या आयुष्यात असं का घडतं ?
29 November 2021
लाल चिखल ,उठून आरड की हँद्रया
घंटी वाजली, शाळा सुटली आन् तुंबून धरल्यालं पाणी फुटावं, तसं दारातोंडून पोरं वाहात सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं
उधळल्यागत झालं. घोळक्या-घोळक्यानं रस्तं तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठात घुसली.
घरं जवळ करीत निघाली. बर्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सकळनं
निघाल्या. उगचच आपून आपल्याला आवकीत-जवकीत साळुंक्यांच्या थव्यागत निघालेल्या
पोरींनी सम्दा रस्ता कालवून सोडला. मास्तरं-प्राध्यापकं सावकाशीनं पाय उचलीत गप्पा
मारीत निघाली व्हती... आम्ही खेड्यावरची पोरं दप्तरं पाठशी टाकून निघालाव. कुणी
आडतीकडं आपलं कुणी आलंय का मनून निघालं, तर कुणी
गाववढीनं गावरस्त्याला लागलं. तिसरा तितंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला... पर
माज्यामागं येगळीच घाई लागल्याली. सोम्मारचा बाजार आसल्यामुळं आज आर्दीच शाळा
व्हती. बाजारगावची माणसं टकुर्यावर काईतरी वझी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैलं, माळवं, दाळी-दुळी इक्रीटिक्रीला जमंल तसं आणलं जात व्हतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली...
आसल्या वर्दळीनं सम्दा सम्दा रस्ता गजबजून गेला व्हता. बाया-बापड्या काचकं-बोचकं
घेऊन धावत-पळत व्हत्या. बोलता बोलता, सवयीनं रस्तं धरून
हालत व्हत्या. बाजार कालवा वाढत व्हता आन् पुरागत माणसं तालुक्याकडं धावत
व्हती...माणसाचं लोंढं बघत, निरखीत म्या बी घाईनं
बाजारतळाकडं निघालो व्हतो. उरात दम भरला व्हता. आज लईच उशीर झाल्यामुळंकाळजात भ्या
दाटत व्हतं. पायात गती तशी टकुर्यात येगळीच चाती फिरत व्हती.
आबानं आन् मायीनं पुन्हा पुन्हा सांगितलं
व्हतं. जतावून ठिवलं व्हतं,
‘बापू...’
‘आंऽऽ’ म्या दप्तर
पाठीशी टाकून निघालो व्हतो.
‘ह्य बक, गेल्या
बाजारासारखं करू नकू. नीट पेठंच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठीव बग. एकांदा तास
बुडला तर बुडला.’
‘व्हय.’ मनून मी
रस्त्याला लागलो.
नदीच्या बाहीर सडकंला लागलो की, मी वही काढायचो आन् इंठाजीचं शब्द पाठ
करीत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची... कवा इतिहासाचं तर कवा
मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. कळंबापस्तोर सहज आब्यास व्हायचा. तसंच
शाळा सुटून गावाकडं येताना बी करायचो... असंच खेळत वाचायचो, वाचीत खेळायचो... समद्या वर्गात वाढ नंबर यायचा. पर ह्या वर्षी मॅट्रिक
व्हती. आबाला, मायीला मोप समजावून सांगितलं. मास्तरानं
दिलेली चिठ्ठी वाचून दावली... पर आबाचं गणितच येगळं व्हतं. मनात असून बी त्यांचा
इलाज नव्हत्या... आन् म्या उरावर दगड घिऊन साल काढायचं ठरविलं. पर ह्यो सोम्मार
मुळावरच यायचा...आन् एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं म्या चमकून म्हागं
बघितलं.‘बाप्या, लेका किती हाका
मारल्या रं...?’ काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला.‘का? काय झालं...?’म्या
जरा थबकून नेट लावलं. तसं गिनानं धोतराच्या कोपर्यात बांधून आणल्याली भाकर माज्या
हातावर टेकविली. आन् उसासा टाकीत, चिडल्यागत बोलला,‘तुह्या म्हातारीनं भाकर दिलीय. आन् चांगली पैसून जागा धर मनून
सांगितलंय... ’गिन्या ह्यवढंच फटकारल्यावानी बोलला. आन् ‘व्हय-न्हाय’ करता करता माणसात इरघळून
गेला...हातातली भाकर म्या दप्तराच्या पिसवीत कोंबली. ताराचं कुंपन वलांडून, मी वाकून बाजारतळावर आलो. आन् चांगली जागा, मोक्याची
जागा हुडकीत हिंडायलो. जागूजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या व्हत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा
आखून घेतलेल्या व्हत्या. मी वाटकूळ भांबावल्यागत हिंडत व्हतो. फिरत व्हतो... चवकडं
दुकानाची मांडामांड चालली व्हती. गाड्या, हातगाड्या
फिरत व्हत्या. च्यावाल्याच्या कळकट किटल्या फिरत व्हत्या. पालं, कनाती ठोकल्या जात व्हत्या. चांभार-मोच्यांची दुकानं थाटत व्हती.
कातडी-सागळीचा घोंगता वास पसरत व्हता. झाडू-फड्याची आन् चऱ्हाटा- दोरखंडाची
मांडामांड व्हत व्हती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाइनी थाटत-सजत व्हत्या.
तांबुळी, भुई गिऱ्हायकाची वाट बघत होते.म्या फिरून
फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिसवीतलं धोतर काढलं आन् लांबवून पसरून
टाकलं. त्याच्यावर दोन-चार दगडं वजन मनून ठेवलं. आबा आन् माय हितं बसत्यात. आन्
आपली जागा...? पुन्हा माजी नजर सांधं हुडकीत फिरायली.
म्या पुन्हा एकदा सम्दीकडं चक्कर टाकली... एक मोकळी जागा हेरून तितंच दप्तर टाकलं.
आन् पलीकडं मेख ठोकणाऱ्या माणसाला म्या हाटकिलं, जवळ
जात इच्यारलं,‘मामा, ही जागा
खुलीय नं...?’‘काय मांडायचंय?’ त्यानं
माज्याकडं न बघताच गुरकल्यागत इच्यारलं.‘उल्सं माळवंय...’ मी उभाच.‘कोण गाव?’ उगचंच
ताठत चालला.मलाच चुकल्यागत वाटलं. न इच्यारता तसंच ‘खडं-दगडं’ मांडून बसाया फायजी व्हतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो,‘हास्यागाव...’‘...जरा पलीकडं सरून बस.’ तवर तर म्या दगडं मांडून बसलो व्हतो. आन् उल्संक उसासा टाकीत तितंच दप्तर
मांडीवर घिऊन बसलो. त्या हातरलेल्या धोतराकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली. आन्
एक एक तुकडा मोडीत चाबलीत र्हायलो...’‘साळंत जातूच?’ त्यो मेख ठोकणारा रस्सी बांधून उठला. माज्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला.
‘हां...’‘कितवीला?’ त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या.
‘मॅट्रिकला...’ म्या
चटणीवर टोच्या मारीत घास उचलला.
‘मॅट्रिकला? मग
आवघडंय् गड्या...’
त्यानं धोतरानं तोंड पुसीत बोलणं वाढविलं. आन् म्या घास
चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर ‘आवघडंय् गड्या’ ह्यो शब्द
मातर मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशीमास्तराचं बोलणं आठवायलं. महात्मा
फुल्यांच्या धड्यातला त्यो माळवेवाला आपल्या आबागतच आसंल? पर काय हुबेहूब वाटायलंय... मला राहवलंच न्हाय. जेवता जेवता दप्तरातलं
पुस्तकं काढलं. आन् घास चावता चावता पानं चाळायलो... तर ह्या खुणा केलेल्या वळी
डोळ्यावाटं शिरायल्या, मना-काळजात पसरायल्या... पटत
चालल्या...
‘...शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणिलेला
एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणितेवेळी, त्या
सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडिते... गाडीभर माळवे
शहरात विकण्याकरिता आणिल्यास.... गाडीभाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन
मुलांबाळांपुढे शिमगा करावा लागतो... असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी
असल्यास... शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे!...’
...माज्या डोळ्यात ही आक्सरं उतरत व्हती.
आतल्या आत त्या आक्सराचा पडताळा करून म्या बघत व्हतो. दर बाजारी आपूनही
भाजीपाला-माळवं आणतो. घसा फाटुस्तर वरडून-सरडून इकतो. आरडून-वरडून बोलतो. पर
आखरीला काय हाय... वाळूत मुतल्यागत ‘फेस ना पाणी.’ मला वाचता वाचताच कसंतरी झालं, टकुरं चकरून
गेलं. इतिहासातला इंठाज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, जोशीसरांचा
आवाज कानामनात घुमू लागला. गोरा इंठाज गेला, पर काळ्या
इंठाजानं तसलंच पाऊल उचललं... आपलं आबा, माय, थोरला भाऊ आन् चार बैलं रातंध्या राबत्यात. उरं-खांदी फुटल्यात... घासातला
घास पिकाच्या वाफ्याबुडी घालून, टकुरं धरून बसल्यात...
दोन सालं झाली, न्हाणीची भित पडलीय... माज्या
डोक्या-उरात सम्दा सम्दा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंठाजांचा व्यापार, सावकारं-संस्थानिकांचे सौक... जोशीसरांनी सांगितल्यालं जळण्याचं उदाहरण...
मला सालोसालचा खंगत-झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला.
...म्या वाटकूळ कसल्यातरी तंद्रीतच बुडून
गेलो होतो... इंठाजांनी सुधारणा केल्या...? छ्या! छ्या
लुटीचीच व्यवस्था केली! मनं, आजच्या योजना...?
‘ये पोरा!’ तसं
म्या दचकूनच वर बघितलं, तर आमच्या गावचा सटवा तेली.
‘का वं?’ म्या
भाकर बांधली. पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं. आन् हिकडं- तिकडं बघत सटवाला इच्यारलं, ‘आबा न् माय दिसली का वं...?’
‘येड्या, तू हितंच
तप घालीत बस. आरं म्हातारं मरणाचं वझं घिऊन बाजारात हिंडायलंय की... तुला जागा
धरायचं सांगितलंय् की जणू...’ आन् सटवा पुन्हा बाजारात
मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेल्या आन् पसरून टाकलेल्या धोतराकडं बघितलं. आन्
तितंच दप्तर ठेवून आबाला-मायीला न्याहाळत, बघत उभं र्हायलो.
टाचा उचलू उचलू निरखायलो... तसं मिरच्याच्या लाईतून म्हातारी दोन वझी घिऊन
यायल्याली दिसली. तसं म्या जरा पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वझं उरी-खांदी
घेतलं.
म्हातारी धपापली व्हती. हुसासा टाकून बोलली, ‘बापू, हाळूच
माय. न्हायतर पोटा-फिटात दुकंल...’ आन् म्या दावलेल्या
धोतराकडं कांद्याचं वझं घिऊन गेली. गवारीचं ठिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लस्लसीत
शेंगा... म्या पोत्याचं तोंड घडीनं गुंडाळीत शेंगापस्तोर गुंडाळलं. गिर्हायकाला
दिसंल आस्या पद्धतीनं पसरून ठेवलं.
...म्हाताऱ्याच्या बी दोन डाली मायीनं तिकडंच
उतरून घ्यातल्या... म्या माजं दुकान लावून आबाकडं गेलो. मायीनं लाल कांद्याचा ढीग
पुढ्यात वतला व्हता. आन् आवरीत-सावरीत त्याला आकारात आणीत व्हती. टमाट्याच्या दोन
मोठमोठ्या डाली बघून माझा ऊरच दडपला. ह्यवढं वझं?... आबानं
टकुर्यावरच आणलं व्हतं. टमाटी फुटत्याल मनून कावडीगत खांद्यावर आणलं व्हतं.
एरांडाच्या पानानं चवकून डाल सावरून बोंदर्यानं बांधली व्हती. आबाबराबर मी बी
डाली सोडल्या. लाल लाल, ताजी ताजी टमाटी... एका किलूत
चार न्हायतर तीनच बसणारी... आन् एक डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून टाकली.
तागडं, मापं बाहीर काढली. आबानं उभं ऱ्हाऊ सम्द्या बाजारावर, माळव्याच्या लाइनीत नजर टाकली. आन्...
‘मायला, जिकडं
तिकडं लालेलालच हाय बाबा...’
सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं
समजावून सांगितलं. पैसं संभाळ मनून जतविलं. आन् कसल्यातरी उसण्या बळानं आरुळी
ठोकली, ‘चला, चला... लाल टमाटी सस्ती लावली. सस्ती...’ अन् ‘सस्ती’वर जोर देऊन आबा आरडत र्हायलं. माय आरडू
लागली. आन् म्या हळूहळू मप्ल्या जाग्याकडं निघालो...
म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी पोत्यावाटं
गिर्हायकाला दिसावी मनून म्या आतल्या आतच ढिगारून ठेवली व्हती. भावाचा कानुसा
घेण्यासाठी म्या शेजारच्या माळवेवाल्याचा अंदाज घेतला. घसट दावून हिकडचं-तिकडचं
बोलत र्हायलो. वळक वाढत चालली. म्या मनातला सवाल केला. आन् तसा समजावून बी घेतला.
मन्लं, ‘मामा, ह्ये माळवं ठोकीनं इकल्यालं परवडतं का असं बसून... इकल्यालं फायद्यात
पडतं...?...’
शेजाऱ्याला पोराचा सवाल जरासाक पोक्त आन् यव्हारी वाटला.
त्यानं हिरव्या मिर्च्याचा ढीग सारखा करीत सांगितलं, ‘...आरं आसं बसून इकल्यालं कसं आयकंल. आस्लंच फायद्यात पडतं.’ म्या त्यातलं बोलणं समजावून घेतलं. पर इकनाराचा रोजगार, टकुऱ्यावरून वाह्यची मजुरी आस्लं जवा मी बोलायलो, तवा शेजार्यानं हासून माज्याकडं बघितलं. आन् सिस्ताईनं बोलल्यावनी बोलला,
‘ह्या बागवानाली कसं परवडतं रं...? आं...
आरं ह्या घेण्यादेण्यातून तर त्यांचा परपंच चालतोय. पण आपल्याला त्ये दांडी
मारायचं जमत नस्तंय...’
असं बोलून पावणा हासाया लागला. मला त्याचं ह्ये बोलणं खरं
वाटलं अन् जरासंक गमतीचं बी वाटलं. मेहनत करून पिकविणारा वांद्यात पण ह्ये दलाल, आडत्ये मातर फायद्यात...?... आता ह्ये आबानं आन् मायीनं गावाकडून चार गठुडी माळवं आणलंय... त्यातलं एक
गठुडं जर हमालानं तितूनच उचललं अन् तितंच उभ्या असणार्या गाडीवर ठेवलं तर एक
रुपाया... पर आबानं, मायीनं, दादानं रानातून गावात, आन् गावातून कळंबात
पर... काय खरंय... माज्या मनात येगळंच गणित जुळत चाललं... आन् आतल्या आत घसरत
चालल्यागत वाटायलं.
‘का रं माप हाय का किलूचं...’ शेजारच्या पावण्यानं मला हाक मारून हाटकिलं. माज्याजवळचा आर्धा किलू मागून
घेतला. आन् त्याची गिऱ्हायकी म्या खिनभर बघत बसलो. पावण्यानं गिऱ्हाईक वारलं. आन्
झाल्याली भवानी कपाळाला लावून आदबीनं बसला. तसं म्या त्याला बोलत बोलत इच्यारलं,
‘...आन् ह्ये ह्याचं भाव कोण ठरवितंय वं...’ ‘कोण कस्याला ठरवील. आपलं नशीब मनायचं आन् गप्प बसायचं...’ पावण्यानं बोलणं थांबवीत आरुळी ठोकली,
‘घ्या घ्या. हिर्वी मिर्ची, लवंगी मिर्ची... घ्या... सस्त लावली सस्त...’ ‘भवानी
झाल्यानं पावण्याला चेव आला व्हता. येगळाच हुरूप चढला व्हता... अन् माज्याकडं बघून
सांगत व्हता.’
‘पोरा, मुका
ऱ्हायलाच तर तसंच गठुडं गावाकडं न्यावं लागंल, बैलाला
खाऊ घालावं लागंल... आरं बोलंल त्यांचं हुलगं इकत्यात, मुक्याचं
गहू बी कुणी इच्यारीत नस्तंय...’ असं सांगत सांगतच त्यो
उभा र्हायला आन् कानाला हात लावून आरडायला-
‘घ्या. घ्या. सस्तीची-मस्तीची. घ्या लवंगी
मिर्ची... हिरवी मिर्ची, हिर्वी हिर्वीऽऽ आलीऽऽ आलीऽऽऽ’
आता बाजार चांगलाच भरला व्हता. चांगली गिर्हायकं पिसव्या
घिऊन हिंडत व्हती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका, पोरी नाजूक जाळीच्या पिसव्या घेऊन
बाजार बघत व्हत्या. भाव करीत हिंडत व्हत्या. धा-पाच पैस्याची हुज्जत घालताना मला
त्यांची चीड यायची. कीव वाटायची... पर ह्ये गिर्हाईक येताना दोन-दोन, तीन-तीन जमून यायचं. घोळका घालून बसायचं. ‘माल’ चिवडून बघायचं. किलूचा भाव करून छटाक-पावशेर मागायचं. आन् उठताना ‘सुटं न्हाई’ मनून पाच-धा पैसं कमी टाकून निघून
जायचं. धा पैसाच्या कोतिंबिरीसाठी सम्दा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिर्हाईक बरं, पण बायकाची हुज्जत मला सम्दी सम्दी म्हायती व्हती...
पैस्यामागं पैसा जात व्हता. माणसं
कुणालातरी फसवायला मनूनच बाजारात आल्याली व्हती. शेतात राबणारी मजुरं सोम्मारचा
वायदा करणार्या फाटक्या मालकाला हुडकीत व्हती. आन् तसली मालकं आडत्याच्या
हातापाया पडत बसली व्हती, तर कुणी बैलं-म्हशी बाजारात
मांडल्या व्हत्या... शेळ्या, अंडी, कोंबड्या, बोंबील, मासळी-सम्द्याचा
वास एकमेकात मिसळून गेला व्हता. भाजीपाला, पसाकुडता
पिसवीनी आणल्याला धान्य-धुन्याचा माल बसला व्हता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट
व्हत व्हती. चाट्याची पालं, बोहरणीचं आरडणं...
भांडीवाल्याचं सौदं झडत व्हतं. पाहुण्या-रावळ्याच्या भेटीगाठी व्हत व्हत्या. दलाल
हेड्याला बोलत व्हते. कांडी-बत्ताश्यासाठी पोरं चिरकत-आरडत व्हती. आन्
दारूगुत्याकडं गेलेल्या नवर्याला बायका धुंडीत व्हत्या. आपल्या परपंच्यावर थुकत
व्हत्या. देवाला शिव्या घालीत, पोराच्या पाठीत रपका
घालीत व्हत्या...
आन् एकाएकीच मला माज्या वळकीचा आवाज आयकू आला. बाजूला
बघितलं, तर आबा उभं र्हाऊन
आरडत व्हतं. हात वर करून करून चिरकत व्हतं. त्यांच्या घस्याला कातर लागल्यागत वरडत
चिरकत व्हतं... मायीचा बी आवाज त्यांच्या म्हागूम्हागच आयकायला यायला... मला
आतल्या आतून डुचमळल्यागत झालं... उगचच भरून आल्यागत झालं. आपून बी आरडावं, उठून उभा र्हावं... घसा फाटुस्तर... पर मला समुरूनच आमच्या वर्गातली पोरं
येताना दिसली. पोरी बी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माज्याकडं तिरकं
बघत हसायच्या... तर कवा मुद्दामच माज्या शेजारच्या माळवंवाल्याशी भाव मोडून निघून
जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात आवघडल्यावनी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा.
पर मास्तरं मुद्दाम माज्याकडून घ्यायची. ‘धंद्यात लाज बाळगूनै’ मनून सांगायची... आता बी माजा जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनघा देशमुख, विमल राऊत आल्या तशा मला कोपर्यातून
बघत गेल्या... म्या तोंडावरला घाम पुसला. त्यांच्याकडं बघता बघताच, आबाचा आवाज आला,
‘चला, चला. सस्त
लावली. बीन बियाची टमाटी... लाल लाल टमाटी.. मस्त-सरकारी टमाटी घ्या घ्या...’
पर गिऱ्हाईक यायचं. डालीत हात घालून बगायचं. चेंडू
दाबल्यागत दाबून न्याहाळायचं. आन् आर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग
उसळून यायचा. काळ्या चष्म्यावाल्याकडं ‘खाऊ का गिळू’ असं डोळं फिरवीत
बघायचं. पर तसंच घटाघटा गिळून सिस्ताईनं सांगायचं...
‘मामा, पुढच्या
आठवडी या... आज न्हाय मिळायचं...’ तसं त्ये माणूस
काईतरी बुटबुटत निघून जायचं. आन् आबा गळ्याच्या दोर्या ताणू ताणू आरडायचं. मधीच
मायीला बी टोचणी देऊन सांगायचं,
‘...मुकी झालीच काय ह्येडंबा? आरड की आवसंन आसल्यावनी...’
आन् आपूनच मुठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माज्याकडं बघत
अन् तितूनच शिव्या हासडून गर्जत, ‘ये पोरा. बसलाच कसा? उठून आरड की हँद्रया... ऊठ
ऊठ.’
...तसा माजा नाइलाज व्हायचा. म्या
वळकी-फिळकीचं माणूस बघून घ्यायचो. आन् मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो,
‘घ्या. घ्या. ताजी गवारी, हिर्वी गवारी सस्त लावलीय् सस्त... घ्याऽऽ घ्याऽऽऽ.’
लगेच डोळं उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत
र्हायचो.
...पयला तास संपला आन् दुसरा तास सुरू झाला.
‘...आन ‘राष्ट्रीय
जागृती’ भाग सुरू झाला. इंठाजांच्या आर्थिक नीतीवर
दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केले. ’चळवळ करा-चळवळ करा’ असा संदेश दिला. ‘तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे.’ दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले. ...कच्चा माल कमी
भावात इंग्लंडला निर्यात होई, तिथला पक्का इथं बाजारपेठ
बनवून विकला जाई... इंग्रज सुधारला. भारत दरिद्री बनला... आज आपण स्वतंत्र आहोत
पण... आजही दादाभाईंची हाक, त्यांचे आवाहन तसेच कायम
आहे. गोरा इंग्रज गेला. पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत
आहेत... कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही. श्रमणारा दलित, भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय...’
मी हे सम्दं कान देऊन, मन लावून ऐकत होतो... वहीत भराभर लिहीत होतो. आपली
गरिबी-आपलं दारिद्य्र ह्याची कारणं पडताळीत व्हतो. ...हीच बोंब शिक्षणाची बी
इंठाजांनी केली मनं... आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचाय...’ हे तो मॅकोले म्हणतो मनं... पर आज काय आन् कसलं घडतंय्?...
मी वर्ग सुटला तरी ह्येच टकुऱ्यात घिऊन वावरतोय. ह्यातलं
कवा कळतंय, कवा कळत बी न्हाय. पर ‘पास’ व्हायची चिमट हाय. पुस्तकातल्या वळी, अन् जोशीसराची, जाधवसराची सांगण्या-शिकविण्याची
ढब डोळ्या-मनापुढून जातच न्हाय...
मग म्या घरी गेल्यावर चिमणीम्होरं बसून रात रात जागायचो.
आर्ध्या-आर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो. पुस्तकातल्या माणसाशी बोलत ऱ्हायचो. तीच
माणसं मला सांगत्यात असला भास मुद्दाम करून घ्यायचो. त्याची सम्दी सम्दी पडताळणी
करून घ्यायचो. आज बाहीर काय चालतंय आन् ह्यात काय हाय. कालचा राजा आजचा राजा, ह्यांचा मेळ घालता घालता खरं-खोटं
पटायचं. राग, संताप, चीड
यायची. पर पुन्हा वाचीत-टिपणं काढीत र्हायचो... कवा आबाला सवड आस्ली तर बोलत, सांगत र्हायचो. आबा-माय मयेत आस्ली की मी हळूच बोलायचो,
‘आबा...’
‘का रं?’
‘एक इच्यारू?’
‘इच्यार की.’
‘नगं, तुमी
रागावताल...’
‘...पर मला आगुदर कळू तर दी की...’
कधी न्हाय त्ये आबानं पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं.
‘मॅट्रिक हुवस्तर मला कळंबातच ठिवताव का?’
...तसं आबा खीनभर दुमतून बसायचे. आन्
कसल्यातरी कातरभरल्या आवाजानं बोलायचे,
‘पोरा... ह्ये मला कळत न्हाय व्हय रं? तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं... पर तुला तरी म्या काय सांगू आन् सांगून तरी काय उपेगय?...’
उगचच आबाचं तोंड गहिवरल्यागत दिसायचं. मला आपून उगचच बोललाव
वाटायचं. माजं मलाच नंतर कसनुसं वाटायचं... पर खीनभर गप्प राहून त्येच काईतरी
काढून बोलायचे. मायीला जवळ बसवून सांगायचे,
‘का गं...’
‘काय?’ माय जवळ
टेकायची.
‘ती दुभती म्हैस इकावी मन्तो...’
‘का?’ माय चमकून
बघत बोलली.
‘म्हैस काय पुन्हा कवा घेता यील, पर पोराचं ह्ये साल गेलं, तर पुन्हा थोडंच
म्हागारी येणार हाय?’
आबाचं बोलणं जडावलं व्हतं. जरासंक आतून-बाहिरून वलसर झालं
व्हतं. पण त्यांचं ह्ये बोलणं खिनाभरातच बदलून गेलं. इच्यारात बसून बसून त्यांनीच
मुद्दा फिरविला... आता सिक्सनाचं तरी कुठं काय र्हायलंय. कुठं नोकर्या तरी
बोंबलायल्यात. त्यापेक्स्या एका म्हशीला दुसरी म्हैस जोड घ्यावी. दुधाचा रतीब
लावावा. न्हाय तर डेरीला घालावं.
उद्याचं काय कुणी बघितलंय. पर ह्या वक्ताला त्यांच्या
बोलण्यात यगळीच धार व्हती. नेटका इरादा व्हता. मनून निस्तं आयकून घेतलं. पर बोलता
बोलता आबाला काय वाटलं की, तट्वन उठून बसलं. आन्
माज्याकडं बघत जवळ सरकत बोलायले,
‘तिला काय कळंतय ह्यातलं? पर बापू, ह्यातलं गणित येगळंच हाय रं...
शिकल्यालं वाया जात न्हाय, पर बाजाराची आडचण हाय बघ.
तुज्यामुळं मास्तराचं, तुमच्या हास्टेलाचं हामखास
गिऱ्हाईक येतंय... झालं तर, एक दुकान वाढेव व्हतंय...’
आबाचं कस्यातूनच मन निघत नव्हतं. एक गरीब पर होतकरू पोर
मनून विद्यार्थी-वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माज्याजवळूनच पोरं नेत होते.
तेवढीच इक्री आबाला भरवश्याची वाटत व्हती. पर मला त्या रेक्टरचं बोलणं आयकून लाज
वाटायची. उगचच आपल्यावर ‘दया’ व्हतीय वाटायचं. मन खजील व्हायचं. पर काईच इलाज चालत नव्हता. एकांदं साल
वाया गेलं तरी काय बिघडतंय? तेवढाच आब्यास पक्का व्हतोय, परपंच्याला बी हातानं हात लागतोय, आसा साधा
हिशेब व्हता आबाचा. आन् ह्यो हिशेब त्यांच्या टकुर्यात बसला की, बसलाच... पर ह्ये सम्दं मला ठावं व्हतं. पर म्या बी मन लावून नेटून बसत
व्हतो. रातीचा दिवस आन् दिवसाची रात करून आब्यास करीत व्हतो. ...पर सोम्मारचा
दिवसच माजा घातवार मनून यायचा. माजा सम्दा इलाजच खुटायचा... पाप केलं आन्
कुणब्याच्या पोटाला आलो वाटायचं.
आज बाजार सुटायचा वकूत झाला व्हता. माणसं बारीक-मोठी
काचकी-बोचकी घिऊन गाववाटंला लागली व्हती. इकनाराची घाई झाली व्हती. आन् गिऱ्हाइकं
भाव पाडून मागत व्हती. ‘माल’ द्यावा तरी पंच्याईत आन् न्हाई द्यावा तर उकिरड्याचीच भरती व्हणार
व्हती... चार रुपयाचं चऱ्हाट दामू मांग तीन रुपयाला सांगत व्हता. आन् दोन रुपयाचा
पावसेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला व्हता. माणसं घाई करीत हिंडत व्हती. गाववढीनं
पाय उचलीत व्हती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिर्हाईकच नव्हतं. ‘नगं-व्हय’ करता करता दोन डालीतून एकच डाल
आर्दी-निम्मी इकली व्हती. आन् एक तशीच न फुटता पडून व्हती. ह्या महिन्यात
टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला व्हता. पीकच अव्वाच्या सव्वा पिकलं व्हतं. सम्दा
बाजारच्या बाजार लालेलाल दिसत व्हता. भाव करताना आताडी पिळत व्हती. माप करताना
काळीज थरथरत होतं. अन् माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत व्हती. दोन रुपये किलुवरून
आबा रुपया किलू मनून आरडत व्हतं. आन् माप टाकल्यावर तोंड कसनुसं करून
दीड-सव्वासाठी आठोव करीत व्हतं. ...मपल्या गवारीच्या शेंगा दोनेक किलू उरल्या व्हत्या.
मायीचं कांदं संपलं व्हतं. आन् ती आबाची चिकाटी बसून बघत होती. मधी काईच बोलायचा
तिचा लाग नव्हता, मनून ती निस्ती गालाला हात लावून बघत
व्हती.
...बाजार आता चांगलाच फाकला व्हता. दुकानं
हालली व्हती. माणसानं माणसं पांगली व्हती. पर आबाचा घसा चिरकतच व्हता...
‘चला, चला. बारा
आणे, बारा आणे किलोऽऽ घ्याऽऽऽ खाऽऽ लाललाल टमाटीऽऽ’
पर माणसं निस्तच चालता चालता बघायची. आबाचा आवतार बघून पुढं
व्हत हासायची. आन् आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं र्हाऊन ऱ्हाऊन आरडायचं,
‘चला. बारा आण्याची आठ आणे-आठ आणेऽऽ झालीऽऽ
झालीऽऽ घ्या घ्या.’
तरी बी गिऱ्हाईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं.
आन् दिवस मावळून आंधारून यायलं. बाजार सुनासुना झाला. पण
आबाला ह्याचं भानच ऱ्हायलं नव्हतं...हातात तागडं धरून उभा र्हात आबा आरडत
व्हतं... किरुळ्या ठोकून आरडत, हाका मारीत चिरकायलं. आन् न र्हाऊन एक गिऱ्हाईक जवळ आलं.
‘काय सांगितलं?’ गिऱ्हायकानं
नवी डाल उघडली. एक-दोन टमाटी चाचपून बघितली.
‘आठ आणे किलू.’ आबाचा
तसलाच तार लावलेला आवाज.
गिऱ्हाईकानं चार-दोन टमाटी हातात घेतली.
‘पर... घ्यायचं काय?’ गिऱ्हायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं.
‘घ्यायचं मंजी...?’
‘सांगणं आठ आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं?’
आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं
बघता बघता तापली. व्हट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं इच्यारलं.
‘पावनं, किती
घ्यायचीत?’
‘सिस्ताईनं सांगितलं, तर पावशेर घेतली आस्ती...’
असं मनून त्यानं चार-दोन मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात
टाकली. आन् पिसवी धरीत त्ये गिऱ्हाईक बोललं.
‘चार आणे किलोनं धरा...’
‘काय?’
आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. सम्दं आंगच
थरारलं. आन् कडाड्कन आबा गरजलं...
‘ये हायवानाऽ जिभीला हाड बसवून घे! चल ऊठ, पळ हितून...’
तसं त्यो माणूस तट्वन उठला. आन् काईतरी बुटबुटत म्हागं सरकत
निघून गेला...
आबा भुसा भरल्यागत ताठच्या ताठच उभं व्हतं. चेहरा तापला
व्हता. आन् डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या व्हत्या.
‘...चार आणे किलो... ईस पैस्या किलो... धा
पैस्या, पाच पैस्या... आरं फुकट घ्या की मनावं...’
आन् एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचविल्या. लालेलाल
टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या
गुडघ्याएवढा रसरसीत ढीग झाला. आन् आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली.
कचाकचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला.
आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच व्हता...
‘लाल चिखल – निवडक भास्कर चंदनशिव’ या इंद्रजित भालेराव
यांनी संपादित केलेल्या आणि लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातून
साभार.
ही कथा मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी
दिल्याबद्दल श्री. भास्कर चंदनशिव आणि लोकवाङ्मय गृह प्रकाशन (श्री. राजन बावडेकर)
यांचे मनःपूर्वक आभार.
माघ पौर्णिमा विशेष
*🟡 माघ पौर्णिमा 🌈🌈🌈🌈🌈 🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...
-
मेरा बाबा देशचालता .... मेरा बाबा देशचालता .... आज सकाळी पावणे नऊच्या दरम्यान माझ्या ऑफिस च्या ग्रुप वरती एक...
-
घंटी वाजली , शाळा सुटली आन् तुंबून धरल्यालं पाणी फुटावं , तसं दारातोंडून पोरं वाहात सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं उधळल्यागत झा...