मध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये मराठी कवितांबद्दल आत्मीयता आहे आणि भावी पिढ्यांवरही उत्तमोत्तम कवितांचे संस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. हे एक प्रकारे सुचिन्ह असले, तरी केवळ यावर समाधान मानून चालणार नाही, तर मराठी साहित्यातील उत्तम काव्यसंग्रहांची ओळख करून घेणे आणि दर्जेदार कविता भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. मराठी साहित्यातील अजरामर ठरलेल्या विशाखा या वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या काव्यसंग्रहाची ओळख करून घेऊया ! विशाखा
हजार शब्दांचा आशय काही ओळींमध्ये नेमकेपणाने आणि सालंकृतपणे कसा मांडला जातो, याचे आदर्श उदाहरण कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेवर निबंध लिहावेत इतक्या त्या आशयघन आणि सकस आहेत. त्या कुठेही बोजड किंवा दुर्बोध मुळीच वाटत नाहीत.
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे शोधण्याला भाकरीचा घास आला योजने आणि अन्ती मृत्यूच्या घासात वेडा सापडे
असे म्हणत कुसुमाग्रजांनी कष्टकऱ्यांची मांडलेली आंतरिक स्थिती वर्तमानातही सुसंगत ठरते. त्यामुळेच १९४१ मध्ये प्रसिद्ध झालेला हा कवितासंग्रह अगदी काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला असावा असेच वाटते.
या काव्यसंग्रहातील काही कविता आपल्या परिचयाच्या आहेत, परंतु त्या याच काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत याची आपल्याला कदाचित जाणीव नसेल.
क्रांतिकारकांचे मनोगत सांगणारी गर्जा जयजयकार क्रांतीचा...ही कविता किंवा लता मंगेशकरांच्या सुमधुर स्वरांचा साज ल्यालेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' आणि सरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घाव शिरी ? या कविता 'विशाखा'तूनच घेतल्या आहेत.
या कवितासंग्रहासाठी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे. या कवितासंग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला प्रसिद्ध मराठी कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत खांडेकर यांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांची पार्श्वभूमी सांगत काही कवितांचे केलेले अल्पसे रसग्रहणही अत्यंत वाचनीय आहे. मराठी साहित्यातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अजरामर ठरलेला हा कवितासंग्रह प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचायलाच हवा.



.jpeg)

.jpeg)

