05 February 2023

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौर्णिमा आहे.. यालाच पाली भाषेत (माघो) असेही म्हणतात*                

   *ही पौर्णिमा  साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते. माघ पौर्णिमेला बुद्धाच्या जीवननात काही महत्वपूर्ण घटना घडल्यात*.

*पहिली घटनाः-विहाराचा* *शोध.वैशाली नगरीत माघ* *पौर्णिमेला अति महत्वाच्या तीन घटना घडलेल्या आहेत. बिहार राज्यातील वैशाली या ठिकाणी भगवंताच्या धातू अवशेषावर बांधलेला एक स्तुप सापडला तो माघ पौर्णिमेलाच. वैशाली मुक्कामी बुध्दांनी आपल्या अंतिम समयी केलेल्या घोषणेस वैशालीवासी व सर्व बौद्ध जनता कदापिही विसरणे शक्य नाही.भगवंताच्या जीवनात व माघ पौर्णिमेस मोठे भावनिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.भगवंतानी येथे केलेल्या घोषणेमुळे वैशालीनगरी अजरामर झाली.बौद्ध साहित्यातील प्रमुख ग्रंथामध्ये वैशाली नगरीचा उल्लेख महत्त्वाच्या ऐतिहासिक गाथा आणि परंपराच्या संदर्भात अनेक वेळा आढळून येतो. आम्रपाली..वैशालीचीच.. महा प्रजापती गौतमीसह ५०० महिलांना प्रथम दिक्षादिली वैशालीतच.. वैशालीच्या गणतंत्र .पध्दतीवरुन भगवंतानी भिक्खू संघाची रचना केली. द्वितीय संगीती संपन्न झाली. वैशालीतीच...आपल्या जीवनातील दोन वर्षावास(५वा आणि ४६वा तथा अंतिम)भगवंतानी या वैशालीतच पूर्ण केले..*

*वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणाभगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*वैशालीचे अंतिम दर्शन*

*आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*१🔹वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*भगवंताच्या महारीनिब्बाणा नंतर कुशीनगर येथे पवित्र धातू अवशेषांची समान आठ भागांत वाटणी करण्यात आली. त्यापैकी एक वाटणी वैशालीचे लिच्छवींनाही प्राप्त झाली. त्यावर त्यांनी एक स्तूप बांधला. चिनी प्रवासी  हुआन-त्संग  यांच्या प्रवास वर्णनावरून मार्च  १८५८ मध्ये श्री अनंत सदाशिव आल्टेकर यांनी हा स्तूप शोधून काढला. त्यापूर्वी तो मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेला होता. भाजलेल्या विटांनी भाजलेला हा साधा स्तूप होता. स्तूपाच्या आत भगवंताच्या पवित्र धातू ठेवलेला एक कुंभ मिळाला*

*२.🔹बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणा*

*वैशाली येथील चापाल विहारात आराम  करीत असतांना भगवंतांनी आपला प्रिय शिष्य आनंद यास जवळ बोलावून म्हणाले हे आनंद!!! तथागत आजपासून तीन महिन्यांनी म्हणजे वैशाखी पौर्णिमेस महारिनिर्वाण पावतील.तो दिवस होता इ.स.पू. ४८४ च्या माघ पौर्णिमेचा.भगवंतांनी घोषित केल्याप्रमाणे वयाच्या ८० व्या वर्षी उत्तररात्री रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमेस कुशीनगर येथे भगवान  बुद्धाचे शालवृक्षाखाली* *महापरीनिर्वाण झाले*.

*३.🔹भगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*तथागतांनी त्यांच्या  महापरिनिब्बानाच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी वैशाली येथील त्यांच्या शेवटच्या चारिकेनंतर शहराच्या बाहेर निघायला लागले, तेव्हा .. त्यांच्या मागे मागे  सर्वलिच्छवी दुःखी मनाने शहराबाहेर चालत आले. त्यांना तथागतांनी मनाई करूनही ते ऐकत नव्हते व मागे-मागे चालतच राहिले. लिच्छवींचा स्नेह,प्रेम व आदर बघून लिच्छवीजवळ* *आपली कोणतीतरी स्मृती राहावी म्हणून त्यांनी त्यांच्या जवळील भिक्षापात्र (चारिकापात्र)  लिच्छवींना दानस्वरुप दिला. ही घटना लिच्छवींनी शीलालेखावर लिहून ठेवली आहे .*

*४🔹. वैशालीचे अंतिम दर्शन*

*भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर अंबलठ्ठिकेला जाण्यासाठी निघाले. नालंदा पाटलिग्राम, कोटीग्राम, नादीका, आणि शेवटी वैशालीला गेले. प्रत्येक ठिकाणी तथागत थांबले आणि उपदेश दिला. तथागत वैशालीला पोहोचल्यानंतर  म्हणाले!!! ही माझी वैशाली नगरीची अंतिम भेट असणार आहे. ही वार्ता संपूर्ण वैशालीत वाऱ्यासारखी पसरली, वैशालीतील सर्व लोक दुःखी, खिन्न, व्यथित झालीत. भोजन  केल्यानंतर तथागतांनी आनंदासह कुसुमावती नदीच्या घाटावरील उंच ठिकाणी चढून संपूर्ण वैशालीचे दर्शन घेतले. वैशालीचे दर्शन घेऊन कायमचे सोडून जाण्यास निघाले. वैशालीला सोडताना  वारंवार मागे वळून.वळून  बघत होते. एवढे प्रेम तथागतांचे  वैशालीवर होते.*

*५🔹.आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*तथागतांप्रमाणे स्थविर आनंदाला सुद्धा आपले परिनिर्वाण समीप आल्याचे आधीच समजले. त्यांना  सुद्धा वाटले की आपले परिनिर्वाण वैशालीलाच व्हावे. आनंद सुद्धा राजगृह सोडून वैशालीला जाण्यास निघाले. वैशालीला स्थविर आनंद येत असल्याची वार्ता कळताच, लिच्छवी स्वागतास तयार होते. परंतु स्थविर आनंदास वाटले की वैशालीस गेलो तर राजा अजातशत्रू यास वाईट वाटेल  आणि माघारी गेलो तर लिच्छवी नाराज होणार म्हणून यावर उपाय म्हणून पाच नदीचा संगम असणाऱ्या नदीच्या मध्यभागी गेले आणि त्या नदीच्या मध्यभागी जाऊन परिनिर्वाण प्राप्त केले. परिनिर्वाण समयी त्याचे वयोमान १२० वर्षे होते.  मगध नरेश अजातशत्रू व वैशालीचे लिच्छवी या दोघांनी स्थविर आनंदाचा अंत्यविधी गंडकी नदी किनारी पार पाडला. आनंदाच्या  अस्थी अवशेषाचे  समान दोन भाग करण्यात आले. एक भाग मगधाकडे तर दुसरा भाग वैशाली राज्यांनी घेतला. दोन्ही राजांनी अस्थी अवशेष आपल्या राज्यात नेऊन त्यावर स्तूप उभारले. लिच्छवींनी उभारलेला स्तूप वैशालीला आजही पाहायला मिळतो. सम्राट अशोकांनी पुढे त्याचे पक्क्या विटांचा वापर करुन या अर्धांग अवशेष स्तुपाचे पुनरुज्जीवन केले. अशोक स्तंभाच्या बाजूला आजही आहे.या स्तूपाच्या उत्खननात अस्थि रक्षेबरोबर पुढील वस्तू आढळून आल्या.एक  कवडी,काचेचे अमुल्यमणी,सोन्याच्या पुतळ्या,ताब्यांची आहत मुद्रा, रत्नजडीत विटा,किरीटयुक्त वानराची मृणमय मूर्ती  या बाबी विशेष उल्लेखनीय आहेत.* 

☸️ *माघ पौर्णिमेच्या  आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!!*✍️✍️✍️✍️✍️                                                           

 🪷 *शुभेच्छूकः- सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा सरचिटणिस भारतीय बौद्ध  महासभा समता सैनिक दल.जळगाव  जिल्हा  पूर्व  विभाग*

06 December 2022

तारळी धरणात लुप्त झालेली गावं आणि संस्कृती:-

 तारळी धरणात लुप्त झालेली गावं आणि संस्कृती:-













डांगीष्टेवाडी, दुडेवाडी, निवडे, सावरघर, भांबे आणि कुशी ही पाटण तालुक्यातील गावं तर करंजोशी, बोपोशी आणि खालची पवारवाडी ही सातारा तालुक्यातील गावं.

90 च्या दशकापासून धरण होणार अशी आवई आणि गोवागावी चर्चा होती, माण खटाव चा दुष्काळी भागाला पाणी मिळावे अशी तेथील स्थानिक नेतृत्वाची मागणी होती तसेच कृष्णा खोरे पाणी वाटपाचा तंटा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश केंद्रीय लवादासमोर गेला आणि युती शासनाच्या काळात आपल्या राज्याच्या वाट्याचे पाणी अडवण्यासाठी कृष्णा खोऱ्यात धरणे बांधण्यासाठी जोरदार तयारी झाली.


तारळी धरणाच्या जागेची चाचपणी करताना चार ठिकाण चर्चेत आली पाहिलं धुमकवाडी दुसरं आता आहे तिथं तिसरं फणसकडा म्हणजे सावरघर आणि निवडे च्या मध्ये तर चौथ भांबे आणि करंजोशी च्या मध्ये, प्रकल्प पाणी साठा पुनर्वसन आणि तालुक्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन सारासार विचार करून आहे ते ठिकाण ठरलं.

1997 साली तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त अरुण भाटिया साहेब, सातारा जिल्हाधिकारी श्रीमती वंदना खुल्लर मॅडम आणि पुनर्वसन जिल्हाधिकारी जोतिबा पाटील साहेब, महाराष्ट्र शासनाने या अधिकारी वर्गावर धरणाचे काम चालू करण्याची जबाबदारी टाकली.


त्या अगोदर साधारण 1992-93 च्या दरम्यान प्रथम धरण क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी भुगर्भात दगडाचा थर आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी मशीन लावल्या गेल्या, आम्ही मुरुड ला शाळेला जाताना रस्त्यात या मशीन लावलेल्या दिसत, तिथं काम करणारी मंडळी बहुतेक मराठी न्हवतेच त्यांची भाषा कन्नडी कामगारांनसारखी होती त्यामुळे हे काय काम चालू आहे आणि का करतायत याची माहिती लागत न्हवती, नदीवरून पाण्याचे कॅन भरून घेऊन येत, त्या मशीन ला डिझेल वरच इंजिन होतं, बोअर मारतात त्यासारखी 2-3 इंचाची पोकळ पाईप होती, ती फिरत फिरत भुगार्भात जात होती, साधारण 10 फूट खोल गेल्यावर लाल दगड लागत होता त्यानंतर काळाकुट्ट दगडाचे ठोकळे आम्हाला तिथे काढलेले येता जाता दिसत, हे सर्व काम इतके गुप्त पणे केले जात होते की भागातल्या लोकांना पुढं काय वाढून ठेवलंय याची कल्पना सुद्धा न्हवती.


सर्व काही शासनाच्या मनासारखं घडत होतं, आमची साधी भोळी माणसं मात्र या सर्वापासून अनभिज्ञ होती.

हळू हळू 1996 ला भूसंपादन अधिकारी धरण बांधकाम करणारे कृष्णा खोरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या गाड्या विभागात फिरू लागल्या लोकांना कामाची चाहूल लागली, प्रथम प्रशासकीय अधिकारी गावात फिरायला खूप घाबरत होते कारण त्या अगोदर कोयना धरण झाले होते तिथली 105 गावं उठून त्यांची वाताहत झालेली सर्वांच्या कानावर होती, खूप हाल सोसले कोयनेतील प्रकल्पग्रस्थांनी, संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज दिली राज्याच्या विकासात वरदान ठरले हे धरण पण तिथल्या लोकांचे झालेले हाल खूप भयानक होते निम्याहून जास्त गावं रायगड ठाणे जिल्ह्यात आणून टाकली ना त्यांची कसली सोय ना जमिनी ना घरे, इथल्या लोकांचे काही संबंधित पै पाहुणे आमच्या विभागाशी संबंधित होते आणि ही सर्व परिस्थिती आमच्या माणसांना माहिती होती पण शिक्षण कमी बाहेरील जगाचा अनुभव नाही भाग सोडला तर त्याकाळी मुंबई मध्ये राहणारे आमचे बापजादे जवळजवळ सर्वच मिल कामगार, बायका पोरं गावाला आणि ही पिढी मुंबईत कामगार म्हणून बैठकीच्या खोलीत राहत असत, प्रत्येक गावाचे एक दोन सार्वजनिक गाळे डिलाईल रोड घोडपदेव आणि दक्षिण मुंबई मध्ये होते, मोजके कामगार आपल्या कुटुंबासहीत मुंबई मध्ये राहत होते आणि मग हे कुटुंब आपल्या गावातील आणि नातेवाईक यांना खाणावळी घालत असे.


दरम्यान विभागीय आयुक्त अरुण भाटिया साहेब यांचे नाव असलेले परिपत्रक प्रत्येक गावाच्या चावडीवर तसेच संबंधित तलाठी कार्यालय तारळे आणि मंडलअधिकारी तारळे (हे कार्यालय आता तलाठी तारळे तलाठी कार्यालय आहे त्या ठिकाणी जुनी माडीची इमारत होती तिथं तळमजल्यावर सर्कल ऑफिस आणि माडीवरून चढून वरच्या मजल्यावर एका बाजूला तलाठी तर दुसऱ्या बाजूला तारळे ग्रामपंचायत ऑफिस होते, आता त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली आहे) येथे लावणेत आले त्या त्या गावातील लोकांना अधिकारी हे दाखवू लागले जणू ते पत्रक म्हणजे कायदा आहे असे भासवले त्या पत्रकातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:-

1) सर्वांना बुडीत जमीन आणि कुटुंबातील लोकसंख्या प्रमाणात 2-5 एकर जमीन मिळणार 

2) संपूर्ण जमिनाला 12 माही पाणी मिळणार आणि सर्व जमिनी कसलेल्या आणि कसदार असणार 

3) भूमिहीन यांना एक एकर जमीन मिळणार 

4) सर्वाना सर्व सोयीयुक्त गावठाण आणि घरे मिळणार 

5) आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवणार 

या अश्याप्रकारे आयुक्त यांचे नावाने अनेक पत्रके काढून प्रकल्पग्रस्थ यांना विश्वासात घ्यायला सुरवात केली.

पुनर्वसन जिल्हाधिकारी जोतिबा पाटील यांनी आपली चानाक्ष नीती वापरून लोकांना विश्वासात घ्यायला सुरवात केली, धरणाच्या भिंतीजवळ रस्त्यावरचं पहिलं गावं डांगीष्टेवाडी असलेने एकदा अधिकाऱ्यांची गाडी गावात येताच तिथल्या आणि करंजोशी गावातील महिलांनी कृष्णा खोऱ्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला त्यांना शेणाचा मार खाऊन परत जावं लागले, पुढे जोतिबा पाटलांनी चाणक्य नीती वापरून काही प्रकल्पग्रस्थांना विश्वासात घेऊन धरणाचा नारळ मे 1997 ला फोडायला भाग पाडलं.


लाल माती, घनदाट झाडी, आंबे फणस उंबर जांभूळ ऐन नाना करवंदी फळबाग आणि रानमेवा असलेली ही संपूर्ण जमीन, बारमाही डोंगरातून ओढ्या नदीतून वाहणारे पाणी, त्यावर आडवे पाट काढून बारमाही बागायत अशी शेती, भात गहू नाचणी भुईमूग ज्वारी आणि सर्व माळवं डाळवं इथं विपुल पिकत होत, भाताचं कोठार म्हणून या गावांना ओळख होती, संपूर्ण शिवार हिरवागार, भाताची सुगी झाल्यावर गहू आणि भुईमूग, मका उन्हाळी पीक, फार कमी खर्चात नैसर्गिक शेती इथलं पाणी डोंगर कपारितून आलेलं त्यामुळं त्याची शुद्धता आणि चव अप्रतिम, पिण्याचे पाणी डोंगरातून नळाने किंवा गावाशेजारी ओढ्याकाठी झरा असायचा, इथली हवा शुद्ध आणि एखाद्या रोग्याला औषधावीणा बरी करणारी.

ही गावं म्हणजे आपसातले सर्व पाहुणेच की, इथले बहुतेक रोटी बेटी चे संबंध एकमेकात गुंतलेले, मुरुड आणि पाच वाड्या, मालोशी, तोंडोशी हीच सर्व पाहुण्यांची गावं, ही गावं एक दुसऱ्याचा इतक्या जवळ की निरव शांततेत एका गावातून मारलेली हाळी दुसऱ्या गावात ऐकायला जायची.....

प्रत्येकाच्या घरी दूध दुभती जाणवरं म्हैस गाय शेळ्या मेंढ्या शेतीसाठी बैलजोडी, घरात जणावरांचा गोटा या संपदेने भरलेला, अमाप डोंगर चरण्यासाठी आणि चरिवासाठी त्यामुळं घरात दूध दही लोणी कोणताही तोटा नाही,


सर्व गावच्या जत्रा संपल्या की शेतात बैलगाडीनं शेणखत टाकायचं, झाडांच्या पालापाचोळा जाळून तराव करायचा, मुरुड नाहीतर बांबवडे च्या सुताराकडून शेतीची अवजारं तयार करून दुरुस्ती करून घ्यायची बहुतेक सर्वच अवजारं ही लाकडापासून बनवलेली, पाऊस चालू व्हायच्या आधी तारळ्याचा बाजार करून संपूर्ण पावसाळ्यात लागणारा बाजार हाट करून ठेवायचा त्यानंतर गौरी गणपतीच्या बाजाराला माणसं तारळ्याला जायची कारण नदी नाले ओढे भरून आल्यावर बहुतेक जाणं येणे बंदच होत असे, जेष्टात पहिला पाऊस पडला की भात नाचणी पेरणीआणि खरीप पेरणी करायची.

पाऊस वाढला की ओढा नदी नाले सर्व दरारून आवाज देत वहात असत, चढाला चढणारे गढूळ पाण्यातील मासे पकडायचा एक वेगळाच आनंद असे, पाऊसात अंगावर घोंगड इरल पोत्याची कागदाची खोळ, बेफाम पाऊस आणि ओसंडून वाहणारे लाल भडक ओघळ ओढे नदी, सर्व शिवार पाणीच पाणी.


पेरणीपासून साधारण 3 आठवड्यानी भाताची लावण चालू, पैरेकरी वाटेकरी हे सर्व आधीच ठरल्याल, पैशाची देवाणघेवाण फारच कमी पैऱ्याची शेती, लागनीला एक महिना लागायचा, बेंदूर यायच्या आत बाहेर भात लागण पूर्ण करायची, बेंदूर सणाला बैलजोडी सजावट गावातून देवळाला मिरवणूक जणू काही पर्वणीच.


हिरवीगार डोंगर झाडी शिवार, चरायला जाणारी जनावर तृप्त होऊन घरी परतायची, श्रावण महिन्यात भजन कीर्तन देवळात श्रावणी सोमवार तेल वात, भात कोळपण खरीप भांगलन करीत भाताचा हिरवागार शिवार नजरेत भरण्यासारखा, शाळेत जाणारी पोर कधी ओघळ ओढे तर कधी नदी ओलांडून मुरुडच्या शाळेला जात असतं. या सर्वच गावात चौथी पर्यंत शाळा होती माध्यमिक शाळा मुरुड ला. कधी हट्ट म्हणून जोरदार पाणी आणि प्रवाह नदीला ओढ्याला असताना पाण्यातून पोहून पार करायचं नडगे गुडघे फुटायचे पण माघार नाही, पाण्याच्या लाटावर स्वार होऊन महापूर पार करायचा आणि जिद्द पूर्ण करण्यासाठी असं अनेकवेळा घडायचं, शाळेत असल्यावर बाहेर किती पाऊस पडतोय नदीला किती पाणी आहे याचा अंदाज येत नसे, कधी कधी वरती खोऱ्यात पडलेला पाऊस जास्त असे आणि त्यामुळे नदीला येणारे पाणी याचा अंदाज लागतनसे तरीपण त्यातून आपली जिद्द करायचीच.

डोंगर शेताचे बांध चारा विपुल सकाळ संध्याकाळ जाणवरांना चाऱ्याच वझ डालग्यातनं गुराकडन येताना डोक्यावर असायचं, जनावर टूम फुगलेली पांदीचा चिखल तुडवीत कडूस पडताना घरी यायची, हाच काळ जाणवरांना बाळ होण्यासाठी कुणाच्या म्हशीला रेडा/रेडी झाली तर कुणाच्या गाईला कालवड/खोंड झाला अश्या गोष्टी खरवीज आणि चीक वाटून आनंद साजरा होत असे, त्याकाळात दुधाची डेरी न्हवती, कळशी हंड्यानं दूध घरी असायचं त्याकाळात काही ठिकाणी खावा करणारा भय्या असायचा त्याला खावा करण्यासाठी दूध घालून त्यातून पैसा अडका उभा राहायचा, लोणी तूप सर्वच कसं बक्कळ उपलब्ध असायच.


गौरी गणपती सणवार जवळ आल्यावर प्रत्येक गावाचा कुंभार मुरुड मध्ये ठरलेला, गावातली पोर मोठी मानस कुंभाराच्या घरी जाऊन आपल्या नावाची चिट्ठी टाकायचे आणि भाताच्या पायलीवर एक पायली पासून आठ पायल्या पर्यंत गणपतीची मूर्ती असायची, गणपती ची सजावट नैसर्गिक दवण्यापासून बनवलेली कडी, जुन्या वह्या पुस्तकं पान फाडून नाचण्याच्या खळी पासून कागदाचं तोरण बनवायचं, कुणाचा फळीवर आडव्या फळीवर बसवलेला गणपती तर कुणाचा टिपावर दिवळीत पण त्या आराशीचा आनंद आजच्या सजावटीला कुठला!, गौरीला फुलवरा लहान तरुण मुली डोंगर कपाऱ्यात जाऊन आणत, नांदायला गेलेल्या मुली आपल्या माहेरी या सणाला हमखास, झिम्मा फुगडी महिला वर्गाला आनंद देणारे दिवस, प्रत्येक गावाला वाज्नत्री होते, सनई सुरात गौरी गणपती आणि अनंत चतुर्थी चे विसर्जन भरून वाहणाऱ्या नदीकाठी होत असे.


दसरा म्हनजे पोटऱ्यात आलेली भात आणि सर्व पीक अक्का शिवार हिरवाइने नटलेला, पाऊसकाळ कमी होत असताना आडव्या पाठाच पाणी आणण्यासाठी धरणं काढायची म्हणजे पाठांची साफसफाई करायची आणि ओढ्या नदीला दगड चिखल मातीचा आडवा बांध धरायचा, प्रेत्येक घरातणं एक दोन मानस खोरी कुदळ घम्याल घेऊन गावानं एकत्र जमून हे काम करायच आणि ओढ्या नदीला खळखळनार काही अंशी पाणी आडव्या पाठानं शेतात, त्या पाटात पाण्याबरोबर आलेले छोटे छोटे मासे पाटात वरतून खालती आणि खालतून वरती खेळत असत हे बघायची वेगळीच मजा, दसऱ्यात देवळात नवरात्री उपवास, कबड्डी खेळण्यासाठी गावातली सर्व पोरं रात्री देवळात याची, देऊळ भरून माणसं, खारीक खजूर काकडी दही असा फराळ.


सुगीच्या दिवसाची चाहूल लागताच गावोगावी पालजत्रा व्हायची, सर्व शिवार भात पिकानं पिवळा गर्भरीत होत चाललेला, पिकाच्या लोंब्या ओतंबून झुकलेल्या हवेवर हळुवार डोलताना, गावाशेजारी शेतात खळी काढायला सुरवात, सवरीचा तिवडा आणून मधोमध उभा करायचा बाजूनं चारा तासून जमीन धोपटून तिवड्याला जनावरं फिरवून चेपून घ्याची, शेणकाला करून खळ सारवून घ्यायचं, शिवारात भात कापून भाताचे भारे मोळापासून बनवलेल्या यटीवर बांधून झाप झाप करत खळ्यावर आणायचे, डोंगरावरच्या वाड्या वस्तीवरची माणसं मदत करायला यायची, जातान त्यांना मोजून न्हवे तर सुपान भात घालायचं, तो रोजगार न्हवता तर ते प्रेम आणि आपुलकी होती, किती गेलं किती राहिलं याच कधीच माप होत नसे, धान्य सुपातून वाऱ्याला देऊन भली मोठी रास लागायची, बैलगाडीन पोती भरून घरी आणायचं, हळूहळू अक्खा शिवार मोकळा होताना घरात टोपली भरून शिल्लक राहिलेलं धान्य पोत्यात पडवीला तसंच, टोपल्याच माप 4 मनापासणं ते 10 मनाची टोपली, टोपल्यांची घरात लाईन लागलेली असे.

दिवाळी ला शाळेला सुट्टी, पहिल्यादिवशी पहाटे कऱ्याट पायाखाली फोडून अंगोळ, नवीन कपडे फटाके टिकल्याची डब्बी दगडावर ठेवून नाहीतर कानशीत पकडून वाजवायची, सुतळी बॉम्ब, अक्खा गाव शिवार डोंगर सकाळ दुपार संध्याकाळ फटाक्यांचा आवाज येत असे, कानावलं लाडू शंकरपाळी अनारसं गोडधोड ला तोड न्हवती, बारा दिवसांन वाघबारस सर्व पोरा पोरींनी घरातणं अंडी बोंबील बटाटा चटणी मीठ त्याल भांडी घेऊन डोंगरात जायचं, शिवरीच्या भल्या मोठ्या झाडाखाली पाण्याच्या शेजारी स्वैपाक बनवून एका मोठ्या पोराला अंगाला तोंडाला राख लावून वाघ बनवायचा आणि अख्या शिवार भर ताणायचा, भुईमूगाच्या शेंगा आणि चवळी मका कणीस तोडून शिजवायच्या, जेवण करायचं आणि संध्याकाळी गुरं घेऊन घरी.


मोकळा झालेला शिवार भाताचा सड पाजून दोन तीन दिवसानंतर गहू पेरणी बैल नांगर पाट्याळ चिरं वढून वावार एकदम मस्तच करायचं, भुईमूग कुरीन फनून चाळून शेंगा चाळायच्या एकमेकांना मदत करून शेंगाच वाटं व्हायचं टोपली भरून राहिलेल्या शेंगा चा घाना गाळून तेल आणि पेंड घरी यायची, भावकी वर बारी ठेऊन प्रत्येक भावकीला त्यांच्या एकूण हिस्याप्रमाणे पाणी, 2-3 आठवड्यानी पाणी पाळी द्याची, गव्हात येणारी चिलची भाजी त्याची अप्रतिम चवं, डोंगरातलं गवत कापायला सौंदा सांगायचा, आणायला गावातील सर्व गडी एकत्र मिळून पाहुनोरावर खळ्यावर आणून गंज लावायची, बैलांना मांडव करायचा, आजूबाजून ताट्या लावून दावन तयार करायची, पेंढ पाला करीत आनंदाने दिवस निघत जायचे.


हिवाळ्याचे दिवस, गल्लीत दारात प्रत्येकाने मुरूम टाकून भुई सारवलेली आजच्या टाईल्स आणि मार्बल ग्रेनाईट ला फिकी पडणार ते तुळतुळीत शेणाच सारवाण थंडीत ऊबदार आणि गर्मीत थंडावा देणारी भुई, कडूसं पडताना खेळलेली लपाछपी खो खो लंगडी, समाज मंदिर, पार, गल्ली, लाकडाचा माचा अंगणात त्या माच्यावर चांदण्या रात्री बसून आईनं बनवलेलं चिलची भाजी आणि भात खाल्लेला त्याची चव आणि आठवन कधीही न जाणारी, नदीला पाणी कमी होत असताना रात्री बत्तीने, जाळ्याने मारलेले मासे, ओढ्यावर नदीवर किवटं करून तर कधी ह्यार धरून मासे पकडायचे.

पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच एसटी बंद ते सुगी झाल्यावर चालू, गावानं एकत्र मिटिंग घेऊन रस्ता बनवायला घरटी माणसं नेमायची बैलाची औत नांगर खोरी कुदळी टिकावं घेऊन नदीच्या उजव्या बाजूनं सावरघर पासून बांबवडे तर डाव्या बाजूनं बोपोशी पासून मुरुड ओढ्या ओघळातून दगड माती भरून रस्ता तयार झाल्यावर एसटीला पत्र देऊन सावरघर आणि बोपोशी एसटी दिमाखात भागात फिरायची.

1990 च्या अगोदर पडद्यावर चे पिच्चर, पाली उंब्रज ला जाऊन पिच्चर ठरवायचा त्याची पोस्टर घेऊन लहान तरुण आजूबाजूच्या गावात बॅटरीच्या लाऊडस्पीकर वर बैलगाडीतून प्रचार करायचा “ऐका हो ऐका आज रात्री…………. मुक्कामी ठीक साडे नऊ वाजता 12X10 च्या पडद्यावर मोहित्याची मंजुळा हा सिनेमा दाखवणार आहे, तिकीट दर 2 रुपये, अक्का मावशी काकी काका सर्वांनी जरूर बघा, याल तर हसाल न याल तर फासाल उद्या शेजारणीला इचरित बसाल! कसा होता रातचा पिच्चर………..” ती रिळ वर फिरणारी मशीन पडदा कणात सर्व काही मजेशीर, 1990 च्या नंतर व्हिडिओ व्हिसीअर आला तारळ्यात जाऊन ठरवायचा मुक्कामी एसटीनं मुरुड पर्यंत तिथून पुढं 4-5 पोरं व्हिडिओ डोक्यावर घेऊन गावात कुणाच्या बारश्या निमित्त तर कुणाच्या लग्नाच्या पूजे निमित्त आजूबाजूच्या गावात खबर लागायची, जेवून झाल्यावर एकत्र पारावर जमायचं स्वेटर शाल बुरणूस अंगावर हातात चार्जिंग वरची ब्याटरी, पायात नॅशनल ची स्लीपर नदीच्या खळखळत्या पाण्यातून कधी कधी धारला लागली म्हणजे एका पायातली गेली आता दुसऱ्या पायातली काय करायची? नदी तून अलीकडं पलीकड करायचं गार पाणी लागून थंडीन हात पाय फुटायचं पण पिच्चर सोडायचा न्हाय, रात्रभर 2-3 पिच्चर बघायचं कधी कधी कामानं अभ्यासांन कंटाळा आल्यावर तिथंच झोप लागायची, पिच्चर संपल्यावर जाग यायची आणि परत पहाटेच कडाक्याच्या थंडीत पारावर येऊन ऊबदार वाकळत पडायचं.


भागातल्या जत्रांची चाहूल लागायची, देवळा जवळच्या शिवरीच्या मोठ्या झाडाला लाल फुलं आली की जत्रा जवळ आली समजायची, महाशिवरात्री झाली की सावरघर लगेच डांगीष्टेवाडी, गुडीपाडव्याला कुशी, रामनवमी ला निवडे आणि बोपोशी, लगेच करंजोशी मालोशी तोंडोशी आणि शेवटी मुरुड, प्रत्येक गाव महिनाभर अगोदर जत्रची मिटिंग घेणार कमिटी नेमणार देवळाच्या अवती भवती सफाई साठी अक्खा गाव, वर्गणी बसवून तमाशा ठरवायला सकाळच्या एसटीनं माणसं जायची आणि मुक्कामाला परत, प्रत्येकगावात, घराच्या भिंती राखनं सारवून दर्शनी भिंतीवर लाल चुनखडी चा कलर, जत्रला नवीन कपडे मुरुड मध्ये हारीशिंप्या कडनं शिवून घ्यायची, नदीवर वाकळा धुवायला सार गावं एकत्र, जत्रत उभा करायला लाकडी झुला, त्याची 5 पैश्यापासून तिकीट, आदल्या दिवशी सकाळ पासून वाण्याची दुकान हजर, गट्ट्या खेळायला खूप मजा, नदीच्या ढूवावर पोहून अंगोळ करून जत्रला तयार, आजूबाजूच्या गावातन देवाच्या काठ्या यायच्या, गोडीशेव जिलेबी चिवडा, लाल भडक गारीगार नुसती मज्जा, कुस्तीचा फडावर कांड बत्तास, नारळ, दोन रुपये, पाच, दहा वीस एक्कावंन आणि एकशे एक अशी कुस्ती बक्षीस, वर्षभर आतुरतेने वाट बघित असलेली जत्रा कधी लगेच संपून जायची आणि पुढल्या जत्रची वाट बघायची.


आंब्या फणसाचा मोसम सुरु, जांभूळ करवंदी आळु दोन महिने खूप सारी मज्जा, झाडावर बसून आंबे फणस जांभूळ खायचं, अक्खा शिवार गहू केलेला, गव्हाची काढणी झाली की शेत नांगरून पुढच्या हंगामासाठी तयार……

असं सर्व असताना 1997 साली कामाला सुरवात केली प्रशासनाने साम दाम दंड भेद सर्व कुटनीतीचा वापर केला आणि कामाला सुरवात केली, नोव्हेंबर 1997 ला स्थानिक मुंबईकर मंडळी नी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचे ठरवलं, प्रत्येक गावात दवंडी देऊन बायका मुलांना घेऊन आणि मुंबई वरून दोन ट्रॅव्हल्स भरून सकाळी सातारा जुना बोगदा येथे जमा झालो मी त्यावेळी 13 वी ला मुंबई ला कॉलेज ला होता आणि त्या ट्रॅव्हल्स नी जाऊन मोर्चात उपस्थित होतो, आमच्या मोर्चा सोबत उरमोडी धरणाचे प्रकल्पग्रस्थ सुद्धा होते, दोन्ही धरणातील सर्व प्रकल्पग्रस्थ सातारा जुन्या बोगद्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी मोर्चा झाला मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यात अनेक प्रमुख मागण्या समोर आल्या पण नंतर च्या काळात प्रशासनाला जे करायचं होतं ते त्यांनी केलंच.


प्रथम पायातली गावं डांगीष्टेवाडी आणि दुडेवाडी येथील लोकांना काही पैशाची भरपाई देऊन आणि काही पोकळ आश्वासने देऊन उठून जाण्यासाठी भाग पाडले, धरणाच्या भिंतीची जागा मोकळी झाल्यामुळे कामाला जोराने सुरवात झाली, मोठमोठ्या जेसीपी पोकलँड क्रेन लागली, अनेक डंपर आले, प्रसाद, सोमा, के के आर, अरविंद अश्या कंपन्याना काम दिलं होतं, या धरणाचा मुख्य कॉन्ट्रॅक्टर ही HCC (हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनी होती तर बाकी या सर्व सब कॉन्ट्रॅक्टर कंपन्या होत्या, बघताबघता खोलवर पाया खांदून झाला, संपूर्ण पाया पूर्ण खडक लागेपर्यंत खाली खोदला, नदीतल्या मुख्य प्रवाहातला पाया जमिनी लेव्हल पर्यंत भरून घेतला, एका बाजूनं वळण करून पाण्याला वाट मोकळी केली, पायाच्या थोडं वरच्या बाजूला पाणी अडवून त्याचा बांधकामासाठी उपयोग करत होते, डोंगरात खाणी काडून काळाकुट्ट दगड धरणावर आणत होते आणि सिमेंट काँक्रीट च धरण उभं राहत होतं,


लाभक्षेत्रात जमिनी संपादन करायला सुरवात झाली, एकूण 7 टी एम सी चा पाणीसाठा त्यापैकी 40% पाणी तारळे विभागाला तर 60% पाणी मान खटाव दुष्काळी भागाला, तारळे विभागात फक्त नदी काठापासून 100 मिटर हेड निश्चित करण्यात आला आणि तेवढेच क्षेत्र ओलिताखाली येणार हे निश्चित झालं त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या गावातील जमिनी फक्त संपादित झाल्या, तारळे विभागातील नदी पासून दूर असलेली अनेक गावं या पाण्यापासून वंचित राहिली त्यामुळे जमीन संपादन कमी झाले, सरकारने काही गावं मान खटाव ला बसावी यासाठी आग्रह धरला पण मान खटाव ची दुष्काळ परिस्थिती लोकांनी पाहिली होती म्हणून जवळ विभागात गावे बसण्यासाठी चढाओढ चालू झाली यातूनच काही गावे वसली पण अजूनही इथले प्रकल्पग्रस्थ आपल्या मूलभूत अधिकारा पासून दूर आहेत, अनेकवेळा धरणाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न झाला लोकांना आश्वासनाची चिरीमिरी देऊन काम रेटवल गेलं, असं करता करता 2004 पर्यंत बहुतेक गावं उठून गेली जी शिल्लक राहिली त्यांचीही परवड झाली आणि हळू हळू उंची वाढवत गावाच्या जवळ पाणी यायला लागलं, शेवटी एकी संपली ताकत कमी पढू लागली आणि 2010 ला प्रशासनाने पूर्ण पाणीसाठा करून आपले दुष्कार्य पार पाडले आणि उर्वरित सर्व प्रकल्पग्रस्थ आपल्या हक्काच्या शोधात अजून पण रोजगार करत आहेत. कोणाला गावठाण मिळाली तर काही खातेदार अजूनही वंचित आहेत,  25 वर्षांपासून काही खातेदारांना अजून एक गुंठा जमीन मिळाली नाही, ज्यांना मिळाली तीही अपुरी तर काही कोर्ट केस काहींना अटकावं होतोय, काहींना बांधवरून जाऊ दिलं जात नाही, उर्वरित गावं मायणी जवळ वसली तिथली परिस्थिती तर या सर्वाहून भयानक आहे, हे सर्व पाहून आणि अनुभवून वयाची 80 - 90 पार करणारी आमची म्हातारी माणसं 60-70 रीत आमची साथ सोडू लागली.


हे सर्व आठवलं तर मनात काहूर माजून मन अगदी गलबलून जातं, तिथला ऊन वारा पाऊस हवा पाणी याला तोड न्हवती फक्त शिवारातन फिरून आलं तरी मन प्रसन्न व्हायचं, आपलाच गावं आपलाच शिवार सर्व काही हक्काचं वाटत होत, अनेकांची खूप वाताहत झाली अनेक गावांचे तुकडे झाले, खूप वेदना होतात मनाला, होत काय आणि झालं काय? असो आमची पुढची पिढी नक्कीच हे विसरणार नाही आणि कष्टाळू बापजाद्याचं अंगात रक्त असल्यामुळे आता पण कुठंही कमी नाहीत आणि भविष्यात नक्कीच गरुड झेप घेतील यात शंका नाही, खूप आठवणी राहिल्या आहेत पुस्तकं लिहिली तरी कमीच पडतील, 90 च्या अगोदर च्या पिढीने हे सर्व जगलं आहे आणि म्हणूनच खूप आदर वाटतो त्या मातीचा🙏

धरणात बाधित झालेली गावं आणि त्यांचं पुनर्वसन:-

डांगीष्टेवाडी -, आता देवाचा चा माळ (मुरुड) आणि सुंदर नगर (आंबळे जवळ) तर काही घरं आदर्शनगर पाली जवळ वसले

दुडेवाडी :- आताचे आदर्शनगर (पाली जवळ) वसले आहे 

निवडे आता राहुडे जवळ वसले आहे

सावरघर :- तारळे आणि चोरे जवळ

भांबे:- वडगाव जवळ

कुशी :- आवर्डे, तारळे नवलाई चा माळ आणि मायणी जवळ

करंजोशी :- गणेशखिंड गणेशवाडी जवळ

बोपोशी आणि खालची पवारवाडी:- मायणी जवळ

अश्याप्रकारे आज ही गावं वसलेली पाहायला मिळतात.


लेखक:- बाळासाहेब सपकाळ (Manager Exports @ Modison Limited, Nariman point) – राहणार:- कामोठे नवी मुंबई, मूळ गाव:- सावरघर ता पाटण

Contact 9076166405

27 February 2022

नोबेल पारितोषिक मिळालेली, कादंबरी

नोबेल पारितोषिक मिळालेली, अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगप्रसिद्ध कादंबरी The Old Man And The Sea चा मराठी अनुवाद!

पुस्तक: एका कोळीयाने

मूळ लेखक: अर्नेस्ट हेमिंग्वे

मराठी अनुवाद: पु. ल. देशपांडे

पेज: १५४ हार्ड कव्हर,रंगीत चित्रे

मूल्य:: ३००/ सवलत मूल्य:२७०/

 टपाल:३५ एकूण:३०५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019

पुस्तक परिचय लेखन: विनोद थोरात

The Old Man and the Sea ही प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगविख्यात कादंबरी. १९५२ साली प्रकाशित झालेली केवळ १२७ पानांची हि कादंबरी एवढी प्रसिद्ध आहे कि जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे आणि त्याच्या करोडो प्रती विकल्या गेल्या आहेत. याच कादंबरी साठी हेमिंग्वे याना पुलित्झर आणि नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. मराठीत या कादंबरीचे भाषांतर सुरवातीला वि स खांडेकर करणार होते. परंतु प्रकृती मुळे ते काही भाषांतर करू शकले नाही. नंतर अनेक वर्षे हे काम रखडल्यावर महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी हे काम हाती घेतले आणि दोन तीन वर्षांच्या परिश्रमानंतर १९६५ साली मराठीतील पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. पुलंनी त्याचे नाव 'म्हातारा आणि समुद्र' असे पाठयपुस्तकातल्या धड्याच्या मथळ्यासारखे न ठेवता 'एका कोळीयाने' असे लोकांना भावेल असेच ठेवले.

'एका कोळीयाने' हि कहाणी आहे सान्तियागो या म्हाताऱ्याची. म्हाताऱ्याने आपल्या उमेदीच्या काळात अनेक मोहिमा पार पाडल्यात. पण आता वृद्धापकाळामुळे तो थकला आहे. गेले ८४ दिवस तो प्रयत्न करतोय, पण तरीदेखील त्याला एकही मोठा मासा मिळालेला नाही. पहिले ४० दिवस एक मुलगा त्याच्याबरोबर मासे पकडायला जात होता, पण ४० दिवस एकही मासा न मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी या दळभद्री म्हाताऱ्याबरोबर जायला पोराला मनाई केली. तरीही नंतर म्हातारा ४४ दिवस एकटाच समुद्रावर जात होता.  पण एके दिवशीही एक मोठा मासा त्याच्या गळाला लागला. मासा एवढा मोठा आणि शक्तिशाली होता कि म्हाताऱ्याला एकट्याला त्याला पकडणे खूप मुश्किल होते. पण म्हातारा एवढा पछाडलेला होता कि सलग तीन दिवस प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तो माशाच्या मागे खोल समुद्रात गेला. या तीन दिवसाच्या काळात म्हाताऱ्याचे माशाबरोबर एक अनामिक नाते तयार झाले. पण पोटापाण्यासाठी म्हाताऱ्याने मोठ्या कष्टाने माशाला मारलेच. मासा एवढा मोठा आणि चविष्ट होता कि म्हाताऱ्याला भरपूर पैसे मिळाले असते. पण माशाच्या मागे म्हातारा किनाऱ्यापासून एवढा दूर आला होता कि परतीची वाट देखील तेवढीच मुश्किल होती. अनेक संकटे त्याची त्या वाटेवर वाट पाहत होती. शेवटी म्हातारा माशाला घेऊन सुखरूप किनाऱ्याला पोहचतो का? त्याला त्याचे पैसे मिळतात का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
 
The Old Man and the Sea हि एक अलौकिक कादंबरी आहे. किनाऱ्यावरून निघाल्यापासून म्हातारा करत असलेला संघर्ष आणि माशाच्या पाठलागावर असताना त्याच्या मनात उठलेले विचारांचे काहूर हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. पु ल देशपांडे यांनी या महान कलाकृतीला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण तरीही त्याला भाषांतराच्या मर्यादा आहेतच. पुलंनी स्वतःच स्पष्ट केले आहे कि ज्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे त्यांना या भाषांतरामध्ये तितके स्वारस्य वाटणार नाही. पण ज्यांना मराठीच कळते त्याना या महान कलाकृतीचा थोडा तरी आस्वाद घेता याना म्ह्णून त्यांनी हे भाषांतर केले आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत देखील असेच आहे कि ज्यांना मूळ कादंबरी वाचणे शक्य आहे त्यांनी ती जरूर वाचावी. ज्यांना अनुवादित साहित्य वाचनाची आवड आहे त्यांना मात्र हि कादंबरी नक्कीच आवडेल.
         - विनोद थोरात



किरण बोरकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती दिली आहे.



सुप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिग्वे यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद.

ही कथा आहे एका म्हाताऱ्या कोळ्याची.त्याने भर समुद्रात एका भल्या मोठ्या माशाशी केलेल्या संघर्षाची .....लढाईची....

तो म्हातारा कोळी रोज समुद्रात जातो आणि रिकाम्या हाताने परत येतो. त्याच्या जोडीला शेजारचा तरुण मुलगा आहे पण मासे मिळत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी आज त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही . एकूण पंच्याऐशी दिवस म्हाताऱ्या कोळ्याला एकही मासा मिळाला नाही . आज तो एकटाच खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आहे आणि त्याच्या गळात अठरा फूट लांबीचा मासा सापडतो . सलग दोन दिवस  एकटा स्वतःशी बडबडत तो त्या अजस्त्र माश्याशी झुंज देतो.आपला अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.पण परतीच्या प्रवासात त्याला शार्क माश्यांच्या झुंडीशी सामना करावा लागतो . जेव्हा तो किनाऱ्याला लागतो तेव्हा माश्याचा फक्त सांगाडा उरलेला असतो.
 अतिशय रोमांचक असे हे पुस्तक आहे . पु.ल.नी लेखकाचा आदर ठेवून जशास तसा अनुवाद केला आहे . यात कुठेही पु.ल.ची शैली दिसत नाही.

 १९५५ साली वि. स. खांडेकर यांनी लेखकाकडे भाषांतराची परवानगी मागितली आणि त्यांना ताबडतोब मिळालीही. खांडेकरांनी १९५५ ते १९५८ पर्यंत भाषांतराचा प्रयत्न केला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे काम सोडून द्यावे लागले .मग ते काम अनंत काणेकर यांच्याकडे आले . पण कामाच्या व्यापात त्यांनाही ते जमेना म्हणून प्रकाशकाला परत केले . शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पु.ल.ना विचारणा केली . पु.ल. नी नाकारले असते तर ते पुस्तक मूळ लेखकाला परत करायचे असे ठरले .पु.ल.आणि सुनीताबाईनी चार वर्षानी त्याचे भाषांतर पूर्ण केले . दरम्यान हेमीग्वे यांचा मृत्यू झाला . त्यामुळे हे पुस्तक हेमीग्वे याना पाठविण्याची इच्छा अपूर्णच राहिली .१९६५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . मूळ पुस्तकातील चित्रांपासून सगळे काही जसेच्या तसे देण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे.
                           - किरण बोरकर

ही पोस्ट पुढे पाठवू!

30 January 2022

गांधी का मारत नाही

गांधी का मरत नाही
लेखक - चंद्रकांत वानखेडे

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींची तीन गोळ्या झाडून हत्या केली. स्वातंत्र्य मिळून अवघे ५ महिने झालेले असताना ज्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्याची अशाप्रकारे हत्या झाल्यामुळे सर्व देश शोकसागरात बुडाला. पण देशातील काही तथाकथित उच्चवर्णीय मात्र या घेटनेने भलतेच आनंदित झाले. गांधींची हत्या झाल्याच्या आनंदात त्यांनी पेढे देखील वाटले. त्याला त्यांनी गांधीवध असे गोंडस नाव दिले. पण क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अनेक ठिकाणी या उच्चवर्णीयांची घरे जाळण्यात आली. ज्या माणसाने आयुष्यभर जगाला अहिंसेची शिकवण दिली त्याच्या नावाने असा हिंसाचार होणे खरेच दुर्दैव होते. पण त्यासाठी देखील या उच्चवर्णीयांनी नथुरामला दोषी न ठरवता गांधींनाच दोष दिला. पुढे कोर्टात गांधी हत्येचा खटला उभा राहिल्यावर नथुरामने कोर्टात आणि त्याच्या अनुयायांनी कोर्टाबाहेर गांधी हत्येचे समर्थन करण्याचा खूप प्रयत्न केला. नथुरामला खरा ठरवण्याचे आणि गांधीला बदनाम करण्याचे प्रयत्न गांधी हत्येच्या ७४ वर्षां नंतरही जोमाने चालू आहेत. पण तरीही या सगळ्यांना पुरून उरत गांधी नावाचा म्हातारा करोडो भारतीयांच्या मनात का जिवंत आहे आणि त्याला मारण्याची खरी कारणे नक्की होती तरी कोणती याचा सांगोपांग उहापोह लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या 'गांधी का मरत नाही' या पुस्तकात केलेला आहे.

१९१६ साली गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे लोकमान्य टिळकांकडे होती. १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर ही सूत्रे गांधींकडे आली. पण त्यापूर्वी 'ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्य पेशव्यांकडून म्हणजे ब्राह्मणांकडून हिरावलेले असल्यामुळे ते परत घेण्याची जबाबदारी आणि हक्क ब्राह्मणांचाच आहे' असे मानणारा मोठा वर्ग स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होता. पण त्यामुळे स्वातंत्र्यलढा केवळ काही उच्चवर्णीय लोकांपुरता मर्यादित राहून समाजातील बहुसंख्य गोरगरीब जनतेचा त्यातील सहभाग खूप अल्प होता. गांधीनी मात्र स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी जनतेसाठी व त्यांच्या सुखासाठी असे म्हणायला सुरुवात केली. त्यांनी मुंबई, दिल्ली, पुणे यासारख्या शहरातील स्वातंत्र्य लढा चंपारण्य, खेडा यांसारख्या ग्रामीण भागात पोहोचवला.  ज्या अस्पृश्यांना समाजात देखील दुय्यम स्थान होते त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घ्यायचे महत्त्वपूर्ण कार्य गांधीजींनी केले. 'अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील डाग आहे' असा ठराव नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. एकूणच काय तर ज्या शुद्रातिशूद्रांना प्रतिष्ठा नाही, त्यांच्या श्रमाला किंमत नाही आणि ज्यांना स्वतःला किंमत नाही त्या सर्वांना सन्मान, किंमत आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हाच गांधींच्या स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि ध्यासही होता. गांधी असा स्वातंत्र्य लढ्याची ढाल करत सामाजिक परिवर्तन करू लागल्यामुळे वर्णवर्चस्व आणि वर्ण श्रेष्ठत्वाचा दंभ असलेल्या उच्चवर्णीयांमध्ये पोटशूळ निर्माण होणे साहजिकच होते. गांधी बद्दल घृणा निर्माण व्हायला सुरवात तेथूनच झाली. 'एखादया वकिलाच्या कामाइतकीच न्हाव्याच्या कामादेखील किंमत आहे, कारण आपण करतो त्या कामातून उदर निर्वाह मिळवण्याचा अधिकार सर्वानाच आहे' असे ते म्हणत. त्यामुळे प्रत्येकाने आपली जात न पाहता शरीरश्रम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जन्माच्या आधारावर मिळालेले श्रेष्ठत्व गांधी कर्माच्या आधारे घालवू पाहत असेल तर त्यालाच या जगातून घालवलेला बरा अशी भावना हिंदुत्ववाद्यांच्या मनात निर्माण न होती तर आश्चर्यच. त्यात त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे अशाप्रकारे कर्मसंकर आणि वर्णसंकर करणारा गांधी उच्च वर्णीयांना रुचणार तरी कसा. 

गांधी मुस्लिम धार्जिणे होते, मुसलमानांना नेहमी झुकते माप देत असल्यामुळेच फाळणी झाली आणि पाकिस्तानला ५५ कोटी पण गांधीमुळेच द्यावे लागले असा युक्तिवाद गोडसे समर्थकांकडून नेहमीच केला जातो. गंमत म्हणजे १९१६ साली लखानौ तेथील अधिवेशनात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे कबूल टिळकांनीच केले होते. भलेही त्यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी त्यांनी अपरिहार्यपणे ते मान्य केले असेल. पण भविष्यातील पाकिस्तान निर्मितीची बीज त्यातच होती. पण म्हणून कोणी टिळकांना मुस्लिम धार्जिणे म्हणत नाही. हिंदुत्ववादी गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणत असताना मुस्लिम लीगला मात्र तर मुस्लिम विरोधी वाटत असतं. एकच माणूस एकावेळी दोन्ही कसे काय असू शकतो? लेखक म्हणतो, 'गांधी असलाच तर केवळ माणूसधार्जिणा होता. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश याची कोणतीही चौकट न मानता, बंधनात न अडकता , बंधना पलीकडे जाऊन तो केवळ माणसांवर प्रेम करणारा होता.' गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असतं. ते म्हणत, 'मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने , मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे'. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणे म्हणजे हिंदू धर्म, हीच त्यांची हिंदू धर्माची व्याख्या होती. गांधी अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न करतात, हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी चळवळ चालवतात; म्हणून गांधी धर्मच बुडवायला निघाला आहे या द्वेषातून काही धर्म मार्तंडांनी १९३४ साली हरिजन यात्रेच्या दरम्यान त्यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला केला. 

नथुरामने केवळ ५५ कोटींचा बदला म्हणून गांधींचा खून केला असता तर त्याआधी त्यांच्यावर ३ प्राणघातक हल्ले का करण्यात आले? ते ५५ कोटी देखील फाळणीच्या वेळी रिझर्व्ह बँकेच्या शिल्लक असलेल्या रकमेचे वाटप झाले त्यातीलच होती. पाकिस्तानच्या निर्मितीचे नथुरामला एवढेच वाईट वाटत होते तर पाकिस्तान निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या महमद अली जीना यांना न मारता त्याने गांधींना का मारले? याचे उत्तर मात्र त्याचे समर्थक देऊ शकत नाही. कारण गांधी हत्येचे खरे कारण तात्कालिक नसून स्वातंत्र्य लढ्यातील अभिजनांचे वर्चस्व झुगारून बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याद्वारे सुरू केलेली अस्पृश्यता निवारण्याची सामाजिक क्रांती हेच होते. एकट्या गांधींमुळे हिंदुस्थानातील विविध समाज समूह जेवढे जवळ आले, तेवढे पूर्वी कोणाही पुढाऱ्यांमुळे आले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, अस्पृश्य, स्त्रिया यांना स्वातंत्र्याच्या केंद्रस्थानी आणि पर्यायाने सत्ताकेंद्राच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न गांधीनी केला आणि दुर्दैवाने तेच त्यांच्या हत्येचे कारण बनले. 
 
गांधीहत्या होऊन आज ७४ वर्ष झाली. पण गांधींची मोहिनी अजूनही केवळ भारतावरच नाही तर जगावर आहे. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, विनोबा भावे, साने गुरुजी, सरोजिनी नायडू, आचार्य कृपलानी, महादेवभाई देसाई यांसारखे नेते तर त्यांचे शिष्य होतेच पण घनश्याम बिर्ला , अंबालाल साराभाई, जमनालाल बजाज, प्राणजीवन मेहता यांसारखे उद्योगपती देखील होते. गांधीनी मानव जातीला समूहाच्या संघर्षाचे एक अभिनव आणि सुसंस्कृत साधन दिले, त्याचे नाव सत्याग्रह. त्यामुळेच जगभरात त्यांचे अनुयायी निर्माण झाले. मार्टिन ल्युथर किंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला, डेस्मंड टूटू, हो चिन मिन्ह पासून ते अगदी अलीकडचे दलाई लामा, आंग की स्यून, बराक ओबामा या सर्वांचे प्रेरणास्थान महात्मा गांधी आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन तर एवढे म्हणाले होते की, 'असा कोणी हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्यांना कदाचित विश्वास बसणार नाही'. गांधीजींचे अहिंसा आणि सत्याग्रह तत्व काय कमाल करू शकते हे आपण नुकतेच शेतकरी आंदोलनात पाहिले. एक वर्ष थंडी पाऊस उन यांची पर्वा न करता सामान्य गरीब शेतकरी दिल्ली सीमेवर बसून राहिले आणि शेवटी त्यांच्या समोर सरकारला झुकावेच लागेल. व्यक्तिगत पराक्रम गाजवण्यापेक्षा समुहाचा पराक्रम जागवणे खूप अवघड कार्य आहे. पण ते गांधीनी केले. भारतीय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकशाही पोहचवण्याचे महान कार्य गांधीनी केले. त्यामुळेच कदाचित आज आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. दुर्दैवाने गांधींचे विचार संपण्याचा सर्वाधिक प्रयत्न भारतातच सध्या सुरू आहे. विशेषतः गेल्या ७ वर्षात नथुरामचे उदात्तीकरण आणि गांधींची बदनामी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. पण आपण हे प्रयत्न हाणून पाडायला हवे. त्यासाठी गांधी वाचायला हवा. वानखेडे सरांनी अगदी सहज सोप्या भाषेत गांधी का मरत नाही आणि तो का मरणार नाही याची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. गांधीं बद्दलचे सारे गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी  'गांधी का मरत नाही' हे पुस्तक तुम्ही वाचाच.

23 January 2022

GeM विक्रेता लॉगिन

 GeM विक्रेता लॉगिन – GeM विक्रेता नोंदणी प्रक्रिया २०२२ मराठी मध्ये
yashwant3280@gmail.com ,

सरकारी ई-मार्केटप्लेस | GeM विक्रेता नोंदणी प्रक्रिया 2021. 2021 मध्ये विक्रेता म्हणून GeM पोर्टलची नोंदणी.
 GeM नोंदणी शुल्क | gem.gov.in विक्रेता नोंदणी. GeM नोंदणी व्हिडिओ. GeM नोंदणी फॉर्म.
रत्नामध्ये उत्पादनाची नोंदणी कशी करावी
सामग्री दर्शवते
GeM seller registration online 2021
भारत सरकारने Amazon आणि Flipkart सारख्या सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची GeM वेबसाइट गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या नावाने सुरू केली आहे, जिथे व्यावसायिक त्यांची उत्पादने विकू शकतात तसेच लोक देखील या वेबसाइटद्वारे त्यांची ऑर्डर देऊ शकतील. देशातील छोट्या शहरांमध्येही सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारकडून सर्व सरकारी विभागांना अत्यावश्यक सेवा आणि वस्तू गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) वरून खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, म्हणजेच सरकारी विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आवश्यक वस्तू सरकारी ई-मार्केटप्लेसवरून ऑनलाइन खरेदी कराव्या लागतील.
GeM (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) म्हणजे काय?

GeM हे एक सरकारी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे पेन, कागद, खुर्ची, टेबल, फर्निचर इत्यादी सर्व प्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंसाठी सरकारी विभागाकडून निविदा जारी केल्या जातात. लोक 4,046,551 पेक्षा जास्त उत्पादने देखील खरेदी करू शकतात आणि 72,010 पेक्षा जास्त सेवा या GeM वर उपलब्ध आहेत. पोर्टल वेबसाइट. पहिल्या वर्षी या वेबसाइटवर ४२० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्या गेल्या, दुसऱ्या वर्षी ६,००० कोटी आणि तिसऱ्या वर्षी २,००० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स.

तुम्ही GeM मध्ये सामील झाल्यास, सरकारी विभागाने जारी केलेल्या निविदांची माहिती एसएमएस आणि ई-मेलद्वारे दिली जाईल, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ देखील करू शकता. ऑनलाइन असल्यामुळे भ्रष्टाचार होत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा माल थेट सरकारला विकू शकता.
GeM पोर्टल 2021 वर कोण विकू शकतो

एखादा विक्रेता जो योग्य आणि प्रमाणित उत्पादन तयार करतो किंवा विकतो तो त्याचा माल GeM वर विकू शकतो, उदाहरणार्थ, जर तुम्ही फर्निचर विकत असाल, तर तुम्ही GeM ला भेट देऊन विक्रेता म्हणून तुमच्या व्यवसायाची नोंदणी करू शकता. तुम्ही नोंदणी केल्यानंतर, कोणत्याही सरकारी विभागाला फर्निचरची आवश्यकता असल्यास, त्या विभागामार्फत फर्निचर खरेदीचे टेंडर GeM पोर्टलवर निघेल, त्याची माहितीही तुम्हाला दिली जाईल, त्यानंतर तुम्ही या निविदांसाठी बोली लावू शकता. हुह. टेंडर मिळाल्यास त्या सरकारी विभागाकडून तुमच्याकडून फर्निचर खरेदी केले जाईल.
GeM विक्रेता नोंदणी आवश्यक कागदपत्रे

    आधार कार्ड
    पॅन कार्ड
    मोबाईल नंबर आधारशी लिंक केला आहे
    उद्योग आधार नोंदणी
    आयकर परतावा,
    बँक खाते तपशील
    चेक रद्द करा
    VAT/TIN क्रमांक

GeM विक्रेत्याची ऑनलाइन नोंदणी 2021

GeM वर नोंदणी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. रत्न विक्रेता नोंदणी 2021 साठी, प्रथम तुम्हाला रत्न पोर्टल www.gem.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला वरच्या उजवीकडे साइन अपचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Buyers and Sellers चा पर्याय उपलब्ध होईल. तुम्हाला उत्पादन किंवा सेवा विकायची असेल तर विक्रेता निवडावा लागतो.
GeM विक्रेत्याची ऑनलाइन नोंदणी 2021

त्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्याखाली REVIEW TERMS & CONDITIONS असलेले बटण क्लिक करावे लागेल. जो कोणी या बटणावर क्लिक करेल, त्याच्या अटी व शर्तींची PDF उघडेल. मी या PDF च्या तळाशी असलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) च्या अटी आणि नियम वाचले आहेत आणि त्यांच्याशी सहमत आहे. पर्यायावर टिक करून, तुम्हाला अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.

आता पुढील पानावर संस्थेचे तपशील द्यावे लागतील, ज्यामध्ये प्रथम व्यवसाय/संस्थेचा प्रकार सांगावा लागेल की तुमचा व्यवसाय मालकी, फर्म, कंपनी, ट्रस्ट किंवा सोसायटी आहे, तो कोणताही असो, तो तुम्हाला निवडावा लागेल. .

07 December 2021

इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
  'अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!

  आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.
पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

06 December 2021

अन्न

 

शरद ऋतूतील एक उज्ज्वल दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक उपाशी टोळ आले.

 हात मध्ये  सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ  मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच 

" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ?  उन्हाळ्यात तू झोपला  होतस कि काय  ?”

टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता,"  "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."

मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...

https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391


माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...